
मुंबई : अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. अपघाताच्या आदल्या दिवशी त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक झाली होती. त्या बैठकीतील क्षण आणि आठवणी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत व्यक्त करताना फडणवीस भावूक झाले.
यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार होते. गेल्या काही दिवसांपासून ते अर्थसंकल्पाच्या तयारीत व्यग्र होते. मात्र २८ जानेवारीला झालेल्या भीषण अपघाताने राज्याने एक धडाडीचा नेता गमावला. शोकप्रस्ताव मांडताना फडणवीस यांनी “असा प्रसंग ओढवेल, याची कल्पनाही नव्हती,” असे सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘लाडकी बहीण’ योजना सुरू करताना अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट परिधान केले होते आणि सर्वांनी तसेच जॅकेट घालावे, असा आग्रह धरला होता, ही आठवण सांगताना सभागृहात क्षणभर स्तब्धता पसरली. शोकप्रस्ताव मांडणे ही घटनात्मक जबाबदारी असली तरी वैयक्तिकदृष्ट्या हा क्षण अत्यंत वेदनादायी असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
निर्णयक्षम आणि स्पष्टवक्ते नेतृत्व हे अजित पवार यांचे वैशिष्ट्य होते. सकाळी सहा वाजल्यापासून कामाला लागणारे, शिस्तप्रिय आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. २२ जुलै हा दोघांचाही वाढदिवस असल्याची आठवण सांगत,वयाने मोठे असल्याने ते माझ्यासाठी दादा होते,असेही त्यांनी स्पष्ट केले.
२७ जानेवारीची शेवटची भेट-
२७ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारत कामकाजाचा सखोल आढावा घेतला. अधिकृत चर्चा संपल्यानंतर दोघे अँटी चेंबरमध्ये गेले आणि सुमारे ३० ते ४० मिनिटे विविध विषयांवर संवाद झाला. त्यानंतर अजित पवार तेथून निघून गेले. मात्र तीच भेट शेवटची ठरेल, याची कल्पनाही त्या वेळी नव्हती, असे सांगताना फडणवीस यांचा आवाज दाटून आला.
राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय राहिलेल्या अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना सभागृहात व्यक्त करण्यात आली.








