वाराणसी : तप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमस्थळी असलेल्या स्टॉल्सवरून फेरफटका मारला आणि विकसित भारत यात्रा व्हॅन तसेच प्रश्नमंजुषा कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना संबोधितही केले.
कार्यक्रमादरम्यान विकसीत भारत संकल्प शपथही घेण्यात आली.भारतभरातील सर्व खासदार आपापल्या मतदारसंघातील विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होत असल्याचे पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. आपणही वाराणसीतील विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये वाराणसीचा खासदार आणि शहराचा ‘सेवक‘ म्हणून सहभागी होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
कल्याणकारी सरकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत कालबद्ध रीतीने आणि कोणत्याही अडचणीशिवाय पोहोचवण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. “लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. त्याऐवजी सरकारने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 4 कोटी कुटुंबांना पक्की घरे देण्यात आल्याची माहिती देताना पंतप्रधानांनी सरकारी योजनांच्या संपृक्ततेची गरज निदर्शनास आणून देत मागे राहिलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला. विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट आतापर्यंत जे मागे राहिले आहेत त्यांच्यापर्यंत योजनांचे लाभ पोहचवण्यासोबतच लाभार्थ्यांचे अनुभव नोंदवणे हे देखील आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “विकसित भारत संकल्प यात्रा ही माझ्यासाठी एक कसोटी आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
अपेक्षित परिणाम साधले गेले आहेत का याचे उत्तर लोकांकडून ऐकायचे आहे, असेही ते म्हणाले. काही काळापूर्वी लाभार्थींशी झालेल्या संवादाचे स्मरण करून पंतप्रधानांनी आयुष्मान भारत आणि आयुष्मान कार्ड यांसारख्या योजनांच्या फायद्यांचा उल्लेख केला.
हे जाणून समाधान वाटले की या योजना आपल्या स्वयंपाक घरे धुर मुक्त करत आहेत, योजनेमधून निर्माण झालेली पक्की घरे नवा आत्मविश्वास मिळवून देत आहेत, गरीब वर्गामध्ये सक्षमतेची भावना निर्माण झाली आहे आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी होत आहे, हे सर्व समाधानदायी आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, यशस्वी योजनांमुळे नागरिकांमध्ये स्वामित्वाची भावना निर्माण होत आहे.
ज्या माणसाला कर्ज आणि इतर सुविधा मिळालेल्या आहेत त्याला देशाविषयी आपलेपणा निर्माण झाला आहे, ही आपली रेल्वे आहे, हे आपले कार्यालय आहे, हे आपले रुग्णालय आहे. जेव्हा अशी आपलेपणाची भावना निर्माण होते तेव्हा देशासाठी काहीतरी करण्याची इच्छाही निर्माण होते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यामुळे येणाऱ्या पिढ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी लोकांमध्ये आत्मविश्वास दृढ होईल, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या.