Published On : Thu, Dec 27th, 2018

भारनियमनमुक्त महाराष्ट्र हे आश्वासन हे आम्ही पाळले : ऊर्जामंत्री बावनकुळे

Advertisement

अंजनगाव (अमरावती): सन 2014 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने भारनियमनमुक्त महाराष्ट्र करू असे आश्वासन दिले होते, ते आश्वासन आम्ही पाळले. गावठाण फिडर वेगळे नसेल किंवा तांत्रिक बिघाड असेल तरच वीजपुरवठा खंडित असतो. ते भारनियमन नव्हे, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अंजनगाव सुर्जी येथे केले.

महापारेषणच्या अंजनगाव सुर्जी आणि धरणी या दोन 220 केवी उपकेंद्राचे लोकार्पण करताना ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री प्रवीण पोटे, आ रमेश बुंदीले, नगराध्यक्ष कमलकांत लडोळे, विजय कालमेघ, प्रवीण तायडे, दळू, महापारेषणचे संचालक गणपत मुंडें, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, मनोहर माहूरे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले अंजनगाव सुर्जीचे हे उपकेंद्र 2008 मधेच सुरू झाले होते पण ते पूर्ण झाले नाही. आमचे सरकार आल्यानंतर या केंद्राचे काम सुरू झाले व आज पूर्णही केले. पंतप्रधान मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौभाग्य योजना आणली आणि 18 लाख लोकांच्या घरातील अंधार संपवला, असे सांगून ऊर्जामंत्री म्हणाले शासन आणि प्रशासन ही दोन चाके आहेत. आम्ही धोरण ठरवतो प्रशासनाने त्याची सकारात्मक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.या सरकारने साडे पाच लाख शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन दिले. आजपर्यंत शेतकऱ्यांना मदतीची भूमिका कुणी घेतली नसेल पण हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असलेले सरकार आहे.

ऊर्जामंत्री पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेअंतर्गत कनेक्शन दिले जाणार आहेत. अमरावती जिल्ह्यात गव्हांकुंड येथे 20 मेगावॅटचा सौर प्रकल्प सुरू होत आहे. सरपंचांनी आपल्या गावाजवळील रिकाम्या जागा द्या तेथेही सौर ऊर्जेचे प्रकल्प उभे करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ. पाणी पुरवठा नळयोजनाही सौर ऊर्जेवर घेऊ तसेच पथदिवेही सौर ऊर्जेवर घेऊ. हे सरकार काम करणारे सरकार आहे. फसवणूक करणारे आम्ही नाही. वीज नाही तेथे साडे तीन लाखाचा सौर कृषी पंप आम्ही फ़क्त 20 हजारात देत आहोत. अमरावती जिल्ह्यात 1000 पंप देण्यास तयार असल्याचेही ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले.

पालकमंत्री पोटे
या भागातील शेतकऱ्यांचे 12000 वीज कनेक्शन पेंडिंग होते भाजप सरकार सत्तेत आल्यावर 24 हजार शेतकऱ्यांना या सरकारने वीज कनेक्शन दिले. तसेच HVDS योजना आणून पुन्हा 4 हजार शेतकऱ्यांना कनेक्शन दिले जाणार आहे, हे या सरकारने करून दाखविले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. ते पुढे म्हणाले- प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम या सरकारने केले. अमरावती जिल्ह्यात 6300 नवीन ट्रान्सफॉर्मर लावले.

मराविमचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ऊर्जामंत्री बावनकुळे यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल एवढे काम ऊर्जा क्षेत्रात झाले असल्याचे पोटे म्हणाले.
आ रमेश बुंदीले यांनी या भागातील ऊर्जा क्षेत्राचे झालेल्या कामांचा आढावा घेतला. 165 नवीन ट्रान्सफॉर्मर या भागात लावले व 95 ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविली असल्याचे त्यांनी सांगितले. अंजनगाव सुर्जी भागात 900 कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याचेही ते म्हणाले.