Published On : Thu, Oct 7th, 2021

प्रभाग २६ भाजपातर्फे प्रधानमंत्र्यांना १०० धन्यवाद पत्र

Advertisement

– नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे नेतृत्व

नागपूर : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गत सलग २० वर्षांपासून सत्तेत आहेत. देशाचे उत्कृष्ट नेतृत्व आणि दुरदृष्टीच्या या नेत्याच्या अनेक महत्वाच्या निर्णय आणि पुढाकारामुळे अनेक तळागाळातील, जनसामान्यांच्या जीवनात प्रकाश पडला. प्रधानमंत्र्यांच्या सत्तेतील २१ व्या वर्षातील पदार्पणानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रभाग २६च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना १०० पोस्ट कार्ड पाठवून त्यांना धन्यवाद दिले.

भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात भाजप प्रभाग अध्यक्ष सुरेश बारई, अशोक देशमुख, सुनील आगरे, रवी धांडे, भूपेश अंधारे, कुशाल वेळेकर, सुरेश मेदे, विक्रम डुंबरे, संजय जानवे, सिंधूताई पराते, डॉली सारस्वत आदींसह अनेकांनी प्रधानमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठविले.

गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे प्रधानमंत्री या प्रवासामध्ये नरेंद्र मोदी यांच्या अभ्यासू नेतृत्वाचा देशाला मोठा फायदा झाला. प्रधानमंत्री झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जे धोरण आणि योजना आखल्या. त्यामुळे समाजातील तळागाळातील व्यक्तींना त्याचा लाभ मिळला. त्यांच्या या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रभाग २६तर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद पत्र पाठविण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन तलाक रद्द करणे व कलम ३७० हटविणे असे महत्वपूर्ण निर्णय घेतले. कलम ३७० रद्द करून डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे ‘एक देश, एक निशान, एक स्थान, एक प्रधान’ हे स्वप्न त्यांनी पूर्णत्वास आणले. मुस्लीम समुदायातील महिलांच्या स्वातंत्र्यास जाचक असलेला तीन तलाक कायदा रद्द केला. तीन तलाक कायद्याला रद्द केल्याने महिलांचे स्वातंत्र्य आणि त्यांचे हक्कांना चालना मिळाली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील प्रत्येक गावात, वस्त्यांमध्ये सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली. जनधन योजनेमुळे नागरिकांना शासनाच्या महत्वाच्या योजनांचा लाभ मिळू शकला. उज्ज्वला गॅस योजनेमुळे गावांमध्ये महिलांना नि:शुल्क गॅस कनेक्शन मिळाले. सरपणासाठी जंगलात जाणे, जंगल तोड याबाबींवर आळा बसला, अशा एक ना अनेक महत्वपूर्ण योजना आणि निर्णयामुळे जनसामान्यांच्या जीवनात प्रकाश पडला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून त्यांना १०० पत्र पाठविण्यात येत आहेत, असे भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यावेळी म्हणाले.