नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमसंदर्भात मोठा निर्णय दिला आहे. या याचिकांवर झालेल्या सविस्तर सुनावणीनंतर आज अखेर सुप्रीम कोर्टानं ईव्हीएम-व्हीव्हीपॅटविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निकाल दिला. या सर्व याचिका फेटाळून लानताना न्यायालयाने मतदान ईव्हीएमवरच होईल,असे स्पष्ट केले.
याबाबत खंडपीठाने दोन निकाल दिले असून एकमत मात्र याचिका फेटाळण्याच्या बाजूनेच असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच, सर्व व्हीव्हीपॅट यंत्रांची मतदानानंतर चाचपणी करण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळली आहे.
न्यायमूर्ती खन्ना व न्यायमूर्ती दत्ता यांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी झाली. आम्ही या प्रकरणात दोन निर्देश दिले आहेत. उमेदवारांच्या चिन्हांची यंत्रांवर प्रक्रिया केल्यानंतर ती यंत्रे सीलबंद करण्यात यावीत. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानापर्यंतच्या किमान ४५ दिवसांचा मधला कालावधी असायला हवा, असे न्यायमूर्ती खन्ना यांनी सुनावणी दरम्यान म्हटले.
इतकेच नाही तर , निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत उमेदवारांना संबंधित ईव्हीएमची पूर्ण चाचपणी करण्याची मागणी करण्याचा अधिकार असेल. यानंतर तज्ज्ञ अभियंत्यांच्या पथकामार्फत ही तपासणी केली जाईल. यासाठी येणारा खर्च संबंधित उमेदवाराला उचलावा लागेल. जर ईव्हीएम मशीनशी छेडछाड केल्याचं निष्पन्न झाले, तर हा खर्च उमेदवाराला परत दिला जाईल”, असं न्यायमूर्ती खन्ना यांनी दिलेल्या निर्देशांमध्ये नमूद केले.