
नागपूर – महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून भारत निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी १२ मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही घोषित केला जाणार आहे.
Featured Products
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार १२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. विशेष म्हणजे, मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
१३ मे रोजी ९ सदस्यांचा कार्यकाळ समाप्त-
विधानपरिषदेतील ९ विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे या जागांसाठी होणारी निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार भाजपला ५, शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेसला १ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही अतिरिक्त मते असल्याने महायुतीकडून अतिरिक्त उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यास ही निवडणूक सरळ न होता चुरशीची होण्याची शक्यता आहे.
कोणकोणत्या सदस्यांचा कार्यकाळ संपतोय?
या निवडणुकीत पुढील सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे: उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड.
महायुतीला स्पष्ट आघाडी-
विधानसभेतील संख्याबळाचा विचार केला असता महायुतीचे वर्चस्व स्पष्ट दिसून येते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी २८ मतांची गरज असते. भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी यांचे एकत्रित संख्याबळ पाहता महायुतीचे किमान ८ उमेदवार निवडून येणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे संख्याबळ मर्यादित असल्याने त्यांना एकच जागा सुरक्षित मानली जाते. दुसऱ्या जागेसाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव करणे सध्या तरी अवघड दिसत आहे.
विधानसभेतील सध्याचे संख्याबळ-
राज्यातील एकूण २८६ आमदारांपैकी महायुतीकडे २३४ आमदारांचे पाठबळ आहे, तर महाविकास आघाडीचे संख्याबळ ४९ आहे. इतर पक्ष आणि अपक्ष मिळून ३ आमदार आहेत.
या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेची ही निवडणूक केवळ औपचारिक राहते की राजकीय रंग चढतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








