मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्येत केवळ पाच महिन्यांत झालेली आठ टक्क्यांची वाढ गंभीर शंका निर्माण करणारी असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. काही निवडणूक केंद्रांवर तर मतदारवाढ २० ते ५० टक्क्यांपर्यंत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांनी मंगळवारी सोशल मीडियावरून एक पोस्ट करत भाजपवर मतदार यादीत हेराफेरी करून निवडणूक जिंकण्याचा आरोप केला. “बीएलओंनी आपल्या अहवालात काही अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे नमूद केले आहे. माध्यमांनीदेखील अनेक ‘बनावट पत्त्यांवर’ असलेल्या मतदारांचा तपास केला आहे. मग निवडणूक आयोग गप्प का? की तोही या कारस्थानात सामील आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी यांनी याआधीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ झाल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातील आकडेवारी दाखवत भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ते पुढे म्हणाले, ही वेगळी हेराफेरी नाही, ही स्पष्ट मतांची चोरी आहे. यात दडपशाहीचा प्रयत्न झाल्यास तो कबुलीचा पुरावा ठरेल.काँग्रेसने यावर उपाय म्हणून ‘मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी’ आणि सीसीटीव्ही फुटेज तातडीने प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.