Published On : Sat, Apr 7th, 2018

विद्यापीठाचे मानांकन अग्रक्रमी राहण्यासाठी कुलगुरुंनी ‘मिशन मोड’ मध्ये काम करावे – राज्यपाल

Advertisement

मुंबई : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे उच्च शिक्षण संस्थांना ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ) रॅकिंग देण्यात येते. या मानांकनामध्ये महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यापीठ आणि महाविद्यालयांचा समावेश व्हावा तसेच विद्यापीठाचे मानांकन अग्रक्रमी असण्यासाठी कुलगुरुंनी मिशन मोड मध्ये काम करावे असे आदेश राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज दिले.

राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आज आयोजित करण्यात आली होती.

राज्यपाल यावेळी म्हणाले, विद्यापीठांचे मानांकन अग्रक्रमी ठेवताना यासाठी प्रत्येक विद्यापीठाने अभ्यासपूर्ण आराखडा तयार करावा. सर्व कुलगुरुंनी येणाऱ्या काळात परीक्षांचे निकाल वेळेत लावणे, विद्यापीठ-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यावर लक्ष देणे, कालबद्ध पध्दतीत एकात्मिक विद्यार्थी व्यवस्थापन प्रणाली विकसित करुन कार्यान्वित करणे, शैक्षणिक लेखापरीक्षण करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करणे आणि प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती याबाबत नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. चॉईस बेस क्रेडिट सिस्टिम आणि कौशल्य शिक्षणावर आधारित असलेले अभ्यासक्रम विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये सुरु केल्यानंतर याबाबतचा प्रगतीदर्शक अहवाल वेळोवेळी सादर करणे आवश्यक आहे.

कुलगुरुंनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख सादरीकरणातून मांडावा – मुख्यमंत्री
विद्यापीठांच्या कुलगुरुंनी आपल्या ज्ञानाचा, आपल्या अनुभवाचा उपयोग विद्यापीठाचे अधिकाधिक श्रेणीवर्धन करण्यासाठी करावा आणि त्यामुळेच पुढील बैठकीत प्रत्येक कुलगुरुंनी आपापल्या विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख सादरीकरणातून मांडावा. विद्यापीठांच्या कुलगुरुंकडे ज्ञान निर्मिती करणारा म्हणून पाहिले जाते. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरुंनी आपले अधिकाधिक योगदान विद्यापीठासाठी द्यावे. येणाऱ्या काळात विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता अधिकाधिक वाढविणे, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या (एनआयआरएफ) रँकिगमध्ये विद्यापीठाचे रँकिग येणे याला महत्त्व द्यावे. यासाठी आपण काय करु शकतो याचा पूर्ण अभ्यास करावा. विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कुशल आणि प्रगोगशील मनुष्यबळ तयार करीत असल्याने विद्यापीठांचे परिसर स्वच्छ आहे का, विद्यार्थ्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळत आहेत का याचाही कुलगुरुंनी अभ्यास करावा. आज केंद्र शासनामार्फत एलईडी लाईट्स लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असताना विद्यापीठांमध्ये एलईडी लाईट्स, उत्तम सोयीसुविधा यासाठी आग्रही असावे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आज अनेक महाविद्यालयांमध्ये उत्तम शिक्षणपद्धती राबविण्यात येत असून ही महाविद्यालये शैक्षणिक प्रगतीत अव्वल आहेत. यामुळे येणाऱ्या काळात उत्तम शैक्षणिक प्रगती दर्शविलेल्या महाविद्यालयांना स्वायत्तता देणे आवश्यक आहे. स्वायत्तता दिल्यानंतर हे महाविद्यालयांचा आढावा उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ठेवावा असेही श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री. तावडे यावेळी म्हणाले, प्रत्येक विद्यापीठाने वेळेत परीक्षा घेणे, तसेच 45 दिवसांमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करणे आवश्यक असून त्यादृष्टीने विद्यापीठाने कार्यवाही करावी.

आज सहयाद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मागील बैठकीतील मुद्यांवर करण्यात आलेली कार्यवाही याबाबतचा आढावा घेण्यात आला. आज झालेल्या बैठकीत विद्यापीठांकडून सध्या राबविण्यात येत असलेले वेगवेगळे उपक्रम याविषयीची माहिती देण्यात आली.

या बैठकीला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, रुसाच्या प्रकल्प संचालक मीता राजीव लोचन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, कौशल्य विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, एआयसीटीईचे संचालक अनिल सहस्त्रबुद्धे यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरु, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.