हैदराबाद : पंतप्रधान Narendra Modi यांनी तेलंगणातील हैदराबाद येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करताना देशवासियांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन केले. सुमारे ९,४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा जागतिक इंधन बाजारावर परिणाम होत असल्याचे सांगत मोदी यांनी इंधन बचत ही सध्याच्या काळातील मोठी गरज असल्याचे नमूद केले. नागरिकांनी इंधनाचा वापर विवेकाने केल्यास देशाचा परकीय चलन साठा टिकवून ठेवण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
ऊर्जा क्षेत्रात भारत वेगाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचे सांगताना त्यांनी सौर ऊर्जा, इथेनॉल मिश्रण, सीएनजी आणि गॅस पाइपलाईन प्रकल्पांचा उल्लेख केला. पर्यायी ऊर्जास्रोतांवर सरकारचा भर वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात तेलंगणाचे मुख्यमंत्री Revanth Reddy यांनी विकासकामांमध्ये राजकीय मतभेद आड येऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर प्रतिक्रिया देताना मोदी यांनी ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज अधोरेखित केली.
तेलंगणामध्ये गेल्या काही वर्षांत रेल्वे, महामार्ग आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.









