Published On : Mon, Dec 4th, 2017

ऊर्जा बचतीच्या यज्ञात प्रत्य़ेकाची आहुती गरजेची – आमदार प्रा. अनिल सोले

Advertisement


नागपूर: पर्यावरण संवर्धन आणि येणा-या पिढीसाठी ऊर्जाबचत करणे गरजेचे आहे. ऊर्जाबचतीसाठी नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशन ऊर्जा बचतीसाठी पोर्णिमा दिनानिमित्त अनावश्यक दिवे बंद ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन करत आहे, तसेच शहरात विविध ठिकाणी पोर्णिमा दिवस साजरा करण्यात येत असल्याने ऊर्जेची बचत होत असल्याची नोंद मनपा विद्युत विभागाकडे आहे. ऊर्जा बचतीच्या या यज्ञात प्रत्येकाची आहुती गरजेची असल्याचे मत आमदार व माजी महापौर प्रा. अनिल सोले यांनी व्यक्त केले.

पोर्णिमा दिनानिमित्त सीताबर्डी येथील व्हेरायटी चौक येथे नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने परिसरातील प्रतिष्ठाने, चौकातील दिवे आदी विद्युत उपकरणे बंद ठेवून पोर्णिमा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्वयंसेवकांनी सिग्नलवर उभ्या राहणा-या वाहन चालकांनाही या दिनानिमित्त आयोजित उपक्रमाची माहिती देऊन सहभागी होण्यासाठी आवाहन केले. नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

प्रसंगी प्रामुख्याने भोलानाथ सहारे, विद्यूत विभागाचे ए.एस.मानकर, ग्रीन व्हिजील संस्थेचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, कल्याणी वैद्य, मेहूल कोसुरकर, विकास यादव, स्मिताली उईके यांच्यासह अनिल झोडे, हर्षा जोशी, रुपेश तांदुरकर, प्रमोद जाधव, अब्दुल शेख, नितीन जोशी यांची उपस्थिती होती.