
नागपूर : विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोरदार फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि गोंदिया जिल्ह्यांसह अनेक भागांत मुसळधार पाऊस व गारपीट झाल्याने गहू, हरभरा, मका यांसारखी रब्बी पिके तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
बुधवारपासूनच वातावरणात अचानक बदल जाणवत होता. काही ठिकाणी सकाळपासूनच तर काही ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. चांदूर रेल्वे परिसरात वीज कोसळल्याचीही घटना घडली. हवामान विभागाने पुढील काही दिवस विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.
हातातोंडाशी आलेले पीक वाया-
रब्बी हंगामातील कापणीच्या उंबरठ्यावर आलेले पीक पावसामुळे आडवे पडल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. अकोट तालुक्यात सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने वडाळी देशमुख, सावरा, रंभापुर, वडनेर, कालवाडी, आसेगाव आदी गावांमध्ये मोठे नुकसान झाले. कांदा, गहू, हरभरा यांसह आंबा पिकालाही फटका बसला आहे.
बुलढाण्यातही मोठा फटका-
मलकापूर, नांदुरा, शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यांत वादळी पावसासह गारपिटीमुळे गहू, हरभरा आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गोंदियात गारपिटीचा कहर-
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिरोली महागाव येथे गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
गुढीपाडवा यात्रेलाही फटका-
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील संत लखमाजी महाराज संस्थानची सुमारे ४०० वर्षांची गुढीपाडवा यात्रा यंदा गारपिटीमुळे बाधित झाली. यात्रेदरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे मंदिर परिसरात चिखल झाला, त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला. बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला.
राज्यातील इतर भागांतही परिणाम-
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी सरींमुळे ज्वारीसह इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात कापणीसाठी तयार असलेले पीक आडवे पडल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
मदतीची मागणी-
या अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले असून नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









