Published On : Sun, Dec 15th, 2019

पिढ्यानपिढ्या महाविकास आघाडीचेच सरकार येईल – उद्धव ठाकरे

Advertisement

नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार फक्त पाच वर्षच टिकणार नाही, तर पुढचे पंधरा, पंचवीस वर्षे टिकेल आणि आज ज्याप्रमाणे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आले आहेत, ते नेहमी सोबत राहतील आणि पिढ्यानपिढ्या महा विकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री झाल्यानंतर संत्रानगरीत प्रथम आगमनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर उद्धव यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत म्हणाले, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. त्यानंतर सत्काराला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी जनतेला प्रश्न केला की तुम्हाला पाच वर्षे सरकार पाहिजे आहे की पुढच्या दहा, पंधरा, पंचवीस वर्ष? त्यावर उपस्थित जनतेने 25 असे म्हणतात जल्लोष केला.

त्यानंतर पिढ्यानपिढ्या महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे भाषणाला उभे होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तेव्हा ‘थांब अरे बाबा आता माझ्या महाराष्ट्राला अधिक फटके नको देऊ’, अशी विनवणी त्यांनी वरुणराजाला केली. उद्यापासून खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री म्हणून माझ्या कारकिर्दीला सुरुवात होणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले प्रशासकीय कामाचा मला पूर्ण अनुभव नसला तरीही सहकारी आणि मायबाप जनता माझ्यासोबत आहे. त्यामुळे अख्ख्या देशाला हेवा वाटेल असे हे सरकार सिध्द होईल, अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली