नागपूर : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांची चाहूल लागली असून राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षांतराच्या तयारीत आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दशहरा मेळाव्यात मोठा धमाका होणार असल्याचे विधान केले होते. मात्र, शिंदे गटाचे नेते तथा आमदार कृपाल तुमाने यांनी त्यावर पलटवार करत ठाकरे गटाला या मेळाव्यानंतर मोठा धक्का बसणार असल्याचा दावा केला आहे.
कृपाल तुमाने म्हणाले, “संजय राऊत यांना सकाळी-सकाळी भोंपू वाजवायची सवय आहे. त्यांना काहीतरी बोलायलाच लागतं. पण लवकरच आम्ही एक मोठा धमाका करणार आहोत. ठाकरे गटाचं जे काही उरलं आहे, त्यांनाही दशहरा मेळाव्यानंतर मोठा धक्का बसणार आहे. त्यानंतर त्यांना कळेल की त्यांचा पक्ष या राज्यातून संपला आहे.”
मुंबईतील ६० टक्के माजी नगरसेवक आमच्या सोबत-
तुमाने पुढे म्हणाले, “त्यांच्या दोन आमदारांना सोडून बाकी सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत. मुंबईतील जवळपास ६० टक्के माजी नगरसेवक आमच्याकडे आले आहेत. उर्वरितही आमच्या संपर्कात असून ते लवकरच येणार आहेत. केवळ वेळ ठरवायची आहे. जेव्हा आम्ही वेळ ठरवू, त्या दिवशी ते सर्व आमच्यात येतील आणि त्यानंतर संजय राऊत यांना खरी ताकद समजेल.”
तुमाने यांनी विश्वास व्यक्त केला की, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप आघाडी जोरदार कामगिरी करेल.