Published On : Wed, Feb 12th, 2020

आयुक्त तुकाराम मुंढे सकाळीच पोहचले भांडेवाडीत

Advertisement

ओला-सुखा कचरा एकत्र बघून व्यक्त केली नाराजी

नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे बुधवारी (ता. १२) सकाळी ९ वाजताच भांडेवाडी डम्पिंग यार्डला पोहचले. तेथील कचऱ्यावर होणाऱ्या प्रक्रियेची माहिती घेतल्यानंतर आणि प्रत्यक्ष बघितल्यानंतर ओला आणि सुखा कचरा एकत्रित बघून नाराजी व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यांच्या या अचानक दौऱ्याने अधिकाऱ्यांमध्ये धडकी भरली असून यापुढे ओला आणि सुखा कचऱ्यावर स्वतंत्र वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया न केल्यास कठोर कारवाई करण्याची तंबी दिली.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज सकाळीच भांडेवाडी डम्पिंग यार्ड गाठले. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, उपअभियंता राजेश दुफारे उपस्थित होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्वप्रथम कचरा वजन करण्याऱ्या पद्धतीची माहिती घेतली. यानंतर ते स्वत: कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर चढले. नागपूरकरांकडून संकलित करण्यात येणाऱ्या कचऱ्याची माहिती घेतली.

कचरा संकलन करणाऱ्या एजंसीकडून अजूनही ओला आणि सुखा कचरा एकत्रितच संकलित करण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसाच एकत्रित स्वरूपातील कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये टाकला जातो आहे. त्यातून प्लास्टिकसुद्धा वेगळे करण्यात येत नसल्याचे त्यांना दिसले. हंजरच्या कचरा कंपोस्टिंग प्रकल्पाचीही माहिती त्यांनी जाणून घेतली. या संपूर्ण प्रकारामुळे नाराज झालेल्या आयुक्तांनी यापुढे असले प्रकार खपवून घेणार नसल्याचे सांगत असे आढळल्यास यापुढे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आयुक्तांना कचऱ्याला प्राथमिकता
नागपूर शहरात सुमारे एक लाख नागरिक अस्थमाने पीडित आहेत. भांडेवाडीतील कचऱ्यामुळे वायू प्रदूषण होत असल्याचे सांगत यापुढे वैज्ञानिक पद्धतीनेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास प्राथमिकता द्यावी. लोकसहभाग आणि मनपाच्या प्रयत्नांनी हे शक्य असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपूर शहरातील कचरा हा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासाठी प्राथमिकता आहे.

नागरिकांनी विलग स्वरूपात कचरा द्यावा, असे आवाहन त्यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. मात्र, तसे होत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी, नागपूर शहरात कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांनी यापुढे नागरिकांकडून ओला आणि सुखा कचरा विलग स्वरूपातच स्वीकारावा, अन्यथा दंड ठोठवा असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

नागरिकांनी सुरुवातीपासूनच कचरा विलग स्वरूपात दिला असता तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. सुमारे अडीच तास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या भागाची पाहणी केली.