नागपूर: रेशीमबाग येथील स्मृती भवनाला पर्यटनस्थळाचा दर्जा असल्याची माहिती राज्य शासनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली व यासंदर्भातील फाईल सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मागून घेतला.
स्मृती भवन परिसरात मनपाच्या सार्वजनिक निधीतील १ कोटी ३७ लाख रुपये खर्चून संरक्षण भिंत व अंतर्गत रोडचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्याविरुद्ध नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. हा परिसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीकृत संस्था नाही. त्यामुळे या परिसरातील विकास कामांवर करदात्यांचे पैसे खर्च करणे अवैध आहे. महानगरपालिका आर्थिक अडचणीत असून अनेक सार्वजनिक योजना रखडल्या आहेत. असे असताना अनोंदणीकृत संघाच्या परिसरात एवढा मोठा खर्च करणे चुकीचे होईल, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अश्विन इंगोले तर, शासनातर्फे अॅड. सुमंत देवपुजारी यांनी बाजू मांडली.