
मुंबई : महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले. भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी “नारी शक्ती वंदन विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव होता, तो विरोधकांनी उधळून लावला,” असा गंभीर आरोप केला.
ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या राजकारणाचाही उल्लेख करत ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले. “बंगालमध्ये वाघीण एकटीच लढतेय, त्यांनी निवडणूक जिंकलीच पाहिजे,” असे वक्तव्य करत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला.
डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिले. “सगळं मलाच पाहिजे, या हव्यासाची वखवख काही जणांना लागली आहे,” असा टोला त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांनाही लगावला.
यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेतील जुने नेते दत्ता साळवी यांचा विशेष उल्लेख करत पक्षनिष्ठेचे उदाहरण मांडले. “नोकरीचा राजीनामा देऊन बाळासाहेबांचे विचार स्वीकारले आणि हजारो कामगारांच्या आयुष्यात प्रकाश आणला. धाडस हीच शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे,” असे ते म्हणाले.
कामगार चळवळीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “गेल्या ५८ वर्षांत कामगार सेनेने एकाही कामगाराची फसवणूक केलेली नाही आणि करणारही नाही.” युनियन तोडून कामगारांना मालकांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
परदेशातील कामगारांचा दाखला देत ठाकरे म्हणाले, “दुबईत काम करणाऱ्या कामगारांनी ‘भारतामध्ये बेकारीने मरायचं, त्यापेक्षा इथे काम करताना मरण पत्करू’ अशी भावना व्यक्त केली. कामगारांच्या लढ्यांशिवाय स्वातंत्र्य आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ पूर्ण झाली नसती.”
ठाकरे यांच्या या भाषणामुळे महिला आरक्षण, कामगार प्रश्न आणि आगामी निवडणुका या मुद्द्यांवरून राजकीय वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








