नागपूर : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ला ‘कॉम्प्युटर गेम’ म्हटल्याने राज्याच्या राजकारणात नवा वादंग निर्माण झाला आहे. भाजपने नानांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करत काँग्रेसवर देशद्रोहाचे आरोप लावले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य करताना म्हटले की, काँग्रेसचा हात पाकिस्तानसोबत आहे. या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला.
या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की,
जे लोक इंग्रजांच्या बाजूने उभे होते, तेच आज आम्हाला पाकिस्तानशी जोडत आहेत.देशभक्तीची सर्टिफिकेट देण्याचा अधिकार अशा लोकांना नाही.एक-दोन शब्द चुकले असतील, पण विचारलेला प्रश्न योग्य होता.
बावनकुळे काय म्हणाले होते?
नाना पटोले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले होते की,काँग्रेसने पुन्हा एकदा दाखवून दिलं की काँग्रेसचा हात पाकिस्तानसोबत आहे. ऑपरेशन सिंदूरच्या नावाने ज्यांनी देशद्रोही वक्तव्य केलं, त्यांनी संपूर्ण भारताचा अपमान केला आहे.
ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक लष्करी मोहिम नाही, तर पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर केलेली शौर्यपूर्ण कारवाई आहे. हे एक जळतं वीरगाथा आहे, जी देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवते. नाना पटोले यांची मानसिकता ही पूर्णपणे देशविरोधी आहे. काँग्रेस व राहुल गांधी भारताबाहेर जाऊन देशाचा अपमान करतात, हे त्यांच्याच कृतीतून दिसून येते.
नाना, भारत कधीही तुम्हाला माफ करणार नाही. तुमचा मन व मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या या घृणास्पद विचारसरणीचा तीव्र निषेध करतो, असेही बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले. या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीच तापले आहे.