Published On : Tue, Jun 15th, 2021

नवीन जगाच्या प्रवासाला निघाले ते दोघे

Advertisement

-गितांजली एक्सप्रेसमधील प्रकार,लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात

नागपूर: दोन मन एकत्रित आल्यानंतर प्रेमाच्या आणाभाका घेतात. कुटुंबीयांचा विरोध होईल म्हणून तो तिला चक्क पळवून नेतो qकवा दोघेही पळून जातात. अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, गितांजली एक्सप्रेसमध्ये घडलेला प्रकार काही वेगळाच आहे. ती एका मुलीची आई आणि तो १९ वर्षाचा अविवाहित युवक आहे. मनपरिवर्तन झाल्याने ते नागपूर रेल्वे स्थानकावर उतरली आणि हा प्रकार समोर आला. लोहमार्ग पोलिसांनी तिला वसतिगृहात ठेवले आहे. तर अविवाहित युवक लोहमार्ग पोलिसांच्या देखरेखीत आहे.

राज आणि राजेश्वरी (रा. पश्चिम बंगाल). राजेश्वरी २३ qकवा २४ वर्षाची आहे. तिला एक पाच वर्षाची मुलगी आहे. पतीशी सतत भांडण आणि मारहाणीमुळे ती कंटाळली आणि माहेरी राहायला आली. राज खाजगी काम करतो. तो नेहमीच राजेश्वरीच्या घराकडे येरझारा मारायचा. यातूनच त्यांची ओळख झाली. मैत्री वाढत गेल्याने दोघांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. ठरल्या प्रमाणे राजने ५० हजार रुपये सोबत घेतले आणि दोघेही हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेसने निघाले.

तिकडे राजेश्वरी बेपत्ता असल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, ती कुठेच आढळून आली नाही. अखेर पोलिस ठाण्यात सूचना देण्यात आली. मंगळवारी सकाळी हावड्यावरून आलेली गितांजली एक्सप्रेस नागपूर रेल्वे स्थानकावर थांबली. प्रवासादरम्यान राजेश्वरीच्या मनात विचारांची गर्दी झाली. मनपरिवर्तन झाल्याने तिने पुढचा प्रवास नाकारला आणि नागपूर रेल्वे स्थानकावर दोघेही उतरले. जवळच आरपीएफ जवान होते. त्यांना मदत मागितली.

मात्र, तिची भाषा त्यांना कळत नव्हती. एका कर्मचाèयाच्या मदतीने भाषेची अडचन दूर करण्यात आली आणि सारा प्रकार लक्षात आला. राजकडे ५० हजार रुपये होते. त्या पैशातून मोबाईल घेतला आणि पैशाचा पाकिट तिच्या जवळ दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. आता त्याच्याकडे ११ हजार रुपये शिल्लक असल्याचेही तो म्हणाला. त्याची बहिण कल्याणला राहते. तिच्याकडे जात होता. लोहमार्ग पोलिसांनी या घटनेची माहिती राजेश्वरीच्या कुटुबीयांना दिली. नातेवाईक येईपर्यंत तिला वसतिगृहात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.