आजपासून म्हणजेच 1 मे 2025 पासून देशभरात काही मोठे नियमबदल लागू झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या खिशावर आणि दैनंदिन व्यवहारांवर होणार आहे. एटीएममधून पैसे काढणे महागले आहे, तर रेल्वे प्रवासाच्या नियमांमध्येही मोठे बदल झाले आहेत. चला, पाहूया असेच 6 महत्त्वाचे बदल कोणते आहेत.
1. ATMमधून पैसे काढणे झाले महाग-
1 मेपासून आता होम बँकेच्या बाहेरच्या एटीएममधून पैसे काढताना प्रति व्यवहार 17 रुपयांऐवजी 19 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच, बॅलन्स तपासण्यासाठी 6 रुपयांऐवजी 7 रुपये शुल्क लागू होईल. एचडीएफसी बँकेने जाहीर केले आहे की मोफत व्यवहार मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारावर आता 21 रुपयांऐवजी 23 रुपये + कर शुल्क आकारले जाईल. पीएनबी आणि इंडसइंड बँकेनेही त्याचप्रमाणे शुल्क वाढवले आहे.
2. कॉमर्शियल एलपीजी सिलेंडर स्वस्त-
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल नाही, मात्र 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरमध्ये किंमतीत कपात झाली आहे. दिल्लीमध्ये सिलेंडर 14.50 रुपयांनी, कोलकात्यात 17 रुपयांनी स्वस्त झाला आहे. नवीन दर: दिल्ली – ₹1747.50, कोलकाता – ₹1851.50, मुंबई – ₹1699, चेन्नई – ₹1906.
3. रेल्वेने वेटिंग तिकिटावर मोठा निर्णय घेतला-
रेल्वेने निर्णय घेतला आहे की आता वेटिंग तिकिट घेऊन स्लीपर कोचमध्ये प्रवास करता येणार नाही. वेटिंग तिकिट केवळ जनरल कोचसाठीच वैध असेल. याशिवाय अॅडव्हान्स बुकिंग कालावधी 120 दिवसांवरून कमी करून 60 दिवस करण्यात आला आहे.
4. 11 राज्यांमध्ये ‘वन स्टेट-वन RRB’ योजना लागू-
1 मेपासून देशातील 11 राज्यांमध्ये ‘वन स्टेट-वन रीजनल रूरल बँक’ ही योजना लागू झाली आहे. या अंतर्गत एकाच राज्यातील सर्व ग्रामीण बँका एकत्र करून एक बँक तयार केली जाणार आहे. त्यामुळे सेवा अधिक सुलभ आणि जलद होतील. ही योजना उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये लागू झाली आहे.
5. अमूलने दूधाचे दर वाढवले-
अमूलने दूधाच्या दरात 2 रुपये प्रति लिटर वाढ केली आहे. ही वाढ 1 मेपासून लागू झाली असून, आधीच मदर डेअरीनेही दरवाढ केली होती.
6. मे महिन्यात 12 दिवस बँका राहणार बंद-
मे महिन्यात विविध सण आणि कार्यक्रमांमुळे देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित कामासाठी जाण्यापूर्वी RBI ची बँक हॉलिडे लिस्ट पाहणे गरजेचे आहे.