मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आगामी आठवड्यात मोठा धक्का बसू शकतो, असा दावा भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. ठाकरे गटात लवकरच मोठी उलथापालथ होणार असून, संपूर्ण पक्षच अस्तित्वात राहणार की नाही, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
महाजन सोमवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीकेची झोड उठवली. “राऊत नाशिकमध्ये संघटनात्मक बैठक घेऊन गेले, पण त्यांच्या बोलण्यामुळे उद्धव ठाकरेसुद्धा त्रस्त झाले असतील,” असे म्हणत महाजन यांनी टोला लगावला. “संजय राऊत एकटेच ठाकरे गट संपवण्यासाठी पुरेसे आहेत. त्यांना कोणाच्या मदतीची गरज नाही,” अशी टिका त्यांनी केली.
महाजन यांनी दावा केला की, नाशिक शहर आणि जिल्ह्यातील अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. “आठ दिवस थांबा, मोठे प्रवेश होतील. काही पक्ष अक्षरशः नेस्तनाबूत होतील,” असे वक्तव्य करत त्यांनी आगामी राजकीय हालचालींचा संकेत दिला.
याच वेळी त्यांनी आपल्या कुंभमेळा मंत्री या जबाबदारीबद्दलही भाष्य केलं. “मी नाशिकचा पालकमंत्री असून कुंभमेळ्याची जबाबदारी माझ्यावर आहे. कालच्या बैठकीला फक्त मंत्री म्हणून मला बोलावलं होतं. आमदार, खासदारांना आमंत्रण नव्हतं. मात्र मुख्यमंत्री आले, म्हणून काही आमदार आले. विशेष म्हणजे या बैठकीला सर्व १३ आखाड्यांचे महंत उपस्थित होते, हे याआधी कधीच घडलं नव्हतं, असे त्यांनी स्पष्ट केले.