नागपूरस्थित तैनात पोलिसांच्या सोयीसुविधांकडे सरकारचे लक्ष नाही

Advertisement


नागपूर: नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांच्या सोयीसुविधांकडे सरकारचे लक्ष नसल्याचा औचित्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि विधानमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी आज विधानसभेत मांडत पोलिसांच्या सोयीसुविधांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी येणाऱ्या राज्यभरातील पोलिसांची नागपूर येथे राहण्याची-खाण्याची सोय योग्यप्रकारे केली जात नसल्याची बाब समोर आली आहे. २४ तास पहारा देणाऱ्या या पोलिसांना त्यांची ज्याठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे त्याठिकाणी किमान खाण्याची आणि राहण्याची सोय होते की नाही. त्यांना डाळ-भात तरी मिळतो की नाही. त्यांना राहत्याठिकाणी योग्य त्या सोयीसुविधा मिळत नाहीत अशी माहिती मिळाली असून याची चौकशी करुन पाहणी करावी अशी मागणी विधानमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केली.