Published On : Sat, Jul 6th, 2019

ग्रापं सचिवांनी जलसंधारणाची मोहीम हाती घ्यावी : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

वडोदा-भूगाव जनसंवाद कार्यक्रम पाचशेवर नागरिकांनी दिली निवेदने

नागपूर: लोकसहभागातून झालेली कामे गावासाठी वरदान ठरू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे काटोल तालुक्यातील खरसोली हे गाव. या गावातील 700 फुटावर गेलेली पाण्याची पातळी लोकसहभागातून गावकर्‍यांनी स्वकष्टाने केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे 50 फुटावर आली आहे. यावरून ग्रामपंचायतींच्या ग्रामसचिवांनी आता जलसंधारण कामाची मोहीम हाती घ्यावी आणि सरपंचासह सर्वांनी लोकसहभागातून ती राबवावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वडोदा येथे जनसंवाद कार्यक्रमातून केले.

या जनसंवाद कार्यक्रमाला सभापती अनिता चिकटे, अनिल निधान, रमेश चिकटे, सरपंच सुनीता इंगोले, विनोद पाटील, रामकृष्ण वंजारी, नाना आकरे, संगीता हिवसे, उपविभागीय अधिकारी श्रीमती सौरंगपते, मनोज चवरे, विद्या निशाने, सुधाकर ठवकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांची निवेदने स्वीकारल्यानंतर तालुक्यातील प्रत्येक विभागाच्या अधिकार्‍यांना या गावात झालेल्या कामांची आणि अपूर्ण कामांची माहिती सांगण्याचे निर्देश दिले. सर्वांसाठी घरे योजना, अतिक्रमणात असलेल्या नागरिकांची माहिती, पट्टेवाटप, नागरी सुविधांची माहिती, राष्ट्रीय रुर्बन योजना, दलित वस्त्यांमधील कामांचा आढावा आदीची माहिती घेतली. वडोदा आणि परिसरातील 30 गावांना शासनाने कचरा उचलून टाकण्यासा़ठी 9 कोटी निधी दिला आहे.

तहसिलदारांनी पंतप्रधान किसान योजना, संजय गांधी, श्रावणबाळ योजना, अन्न सुरक्षा योजना, कृषी विभागाकडून सुरु असलेल्या योजनांची माहिती दिली. महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले-पूर्वी फक्त एकच फीडर होते. आता दोन फीडरची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होणार नाही. महाऊर्जाने केलेल्या कामाची माहिती दिली.

आरोग्य विभाग, जलसंधारण विभाग, जि.प. बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला बाल कल्याण विभाग या विभागांनी केलेल्या कामाची माहिती नागरिकांसमोर ठेवली. सर्व अपूर्ण कामे 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांना दिले. कोट्यवधी रुपयांच्या निधीची कामे या परिसरात सुरु असल्याचे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीवरून जाणवले. भरपावसात या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व महिलांनी गर्दी केली होती.