नागपूर – उपराजधानी नागपूरचे झपाट्याने होत असलेले विस्तार आणि वेगाने वाढणारी लोकसंख्या यामुळे शहरातील ट्रॅफिक समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
शहरात वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने आठ ठिकाणी नवीन आरयूबी (रेल्वे अंडर ब्रिज) आणि आरओबी (रेल्वे ओव्हर ब्रिज) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे 510 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने प्रशासनाने 2025 सिटी मोबिलिटी प्लान तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली असून, यासाठी विशेष टीमची स्थापना करण्यात आली आहे.
तीन टप्प्यांत अंमलबजावणी-
सिटी मोबिलिटी प्लान (CMP) अंतर्गत ट्रॅफिक समस्येवर उपाययोजना करणारी प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. अहवालानुसार, योजनेची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे:
पहिल्या टप्प्यात, 90 कोटी रुपयांच्या खर्चातून दोन उड्डाणपुल (फ्लायओव्हर) बांधण्यात येणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात, 100 कोटी रुपयांच्या खर्चाने दोन आरयूबी आणि आरओबी उभारले जातील.
तिसऱ्या टप्प्यात, उर्वरित कामांची पूर्तता केली जाईल.
या भागांमध्ये उभारले जातील नवीन पूल-
CMP टीमने सादर केलेल्या अहवालानुसार, पुढील आठ प्रमुख ठिकाणी नवीन आरयूबी आणि आरओबी उभारले जाणार आहेत:
आरबीआय चौक
अजनी चौक
कोराडी नाका
न्यू काटोल नाका
कामठी
मेडिकल चौक
मानेवाडा
तथागत चौक
या सर्व भागांमध्ये वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या झाली असून, नागरिक वैतागले आहेत. आरयूबी आणि आरओबी उभारल्यास या ठिकाणांतील वाहतूक सुरळीत होण्यास मोठा हातभार लागणार आहे.शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तयार होणारा हा सिटी मोबिलिटी प्लान नागपूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.