Published On : Wed, May 5th, 2021

“पंतप्रधान कार्यालय काही कामाचं नाही, करोनाविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्व गडकरींकडे द्या”; भाजपा खासदाराची मागणी

Advertisement

देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. रोज साडेतीन लाखांहून अधिक नवे रुग्ण देशात आढळून येत आहेत. करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. असं असतानाच आता थेट भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्राला घरचा आहेर दिलाय. पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या करोना माहमारीच्या काळामध्ये काहीच कामाचं नसून सध्याची करोना परिस्थिती हातळ्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी स्वामी यांनी केलीय. स्वामी यांनी सध्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हे खूपच नम्र असून त्यांना त्यांच्या खात्याचं काम मोकळेपणाने करु दिलं जात नसल्याचं म्हटलं आहे.

India will survive Coronavirus Pandemic as it did Islamic invaders and British Imperialists. We could face one more wave that targets children unless strict precautions now are taken. Modi should therefore delegate the conduct of this war to Gadkari. Relying on PMO is useless

— Subramanian Swamy (@Swamy39) May 5, 2021

“ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण करोना व्हायरसच्या साथीचा सामना करुन नक्कीच टीकू. आता आपण नीट काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाहीत तर मुलांवर परिणाम करणारी आणखीन एक लाट आपल्याकडे येईल. म्हणून मोदींनी या करोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचं ठरणार नाही,” असं स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

No No. Harsh Vardhan has not been allowed free hand. But he is too polite to assert his authority. With Gadkari he will bloom

— Subramanian Swamy (@Swamy39) May 5, 2021

तसेच अन्य एका ट्विटमध्ये मी पंतप्रधान कार्यालयासंदर्भात भाष्य केलं असून तो एक विभाग आहे. पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे लक्षात घ्यावं, असंही स्वामींनी म्हटलं आहे. स्वामी यांच्या या ट्विटवर सध्याचे आरोग्यमंत्री असणाऱ्या हर्ष वर्धन यांना पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली त्यावरही स्वामींनी उत्तर दिलं. “नाही, हर्ष वर्धन यांना मोकळेपणे काम करु दिलं जात नाही. मात्र अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल,” अशी अपेक्षा स्वामींनी व्यक्त केलीय.

Because dealing with COVID 19 needs an infrastructure framework in which aspect Gadkari has proved his ability

— Subramanian Swamy (@Swamy39) May 5, 2021

गडकरीच का असा प्रश्न एकाने विचारला असता स्वामींनी, “करोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करुन दाखवलंय”, असं सांगितलं.

I would favour additional charge to @nitin_gadkari of the Health Ministry

— SUHEL SETH (@Suhelseth) May 4, 2021

सध्या नितीन गडकरी हे केंद्रातील मोदी सरकारमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत.

गडकरींकडे करोनाविरुद्धच्या मोहिमेचा सर्व कारभार द्यावा या स्वामींच्या मागणीला अनेकांनी सहमती दर्शवल्याचं ट्विटरवर पहायला मिळत आहे. गडकरी हा शब्द ट्विटरवर ट्रेण्ड होत असून स्वामींनी सुचवलेला पर्याय अगदीच योग्य असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. लेखक आणि अभिनेत्या असणाऱ्या सुशील सेठ यांनीही गडकरींना या कामासाठी नियुक्त केलं पाहिजे अशी मागणी करणारं ट्विट केलं आहे.