नागपूर: जरीपटका परिसरातील हुडको कॉलनीमधील दूषित पाणी आणि इतर गंभीर समस्या घेऊन मनपात आलेल्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर नंदा जिचकार यांनी आज बुधवारी (ता. २५) तातडीने परिसराचा दौरा केला. नागरिकांच्या समस्या ‘ऑन स्पॉट’ ऐकून घेतल्या आणि पुढील काही दिवसांत या समस्यांना सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महापौरांच्या या भूमिकेचे स्वागत करीत नागरिकांनी मनपाचे आभार मानले.
या दौऱ्यात महापौर नंदा जिचकार यांच्या समवेत उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अश्विन मुदगल, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, नगरसेविका प्रमिला मंथरानी, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) एस.बी. जैस्वाल, कार्यकारी अभियंता प्रदीप राजगिरे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, अभियंता नंदकिशोर सालोटकर, संजय चौधरी उपस्थित होते.
महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांसमोर नागरिकांनी परिसरातील समस्या मांडल्या. दूषित पाण्याची समस्या गंभीर असून नागरिकांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसल्याची बाब नागरिकांनी लक्षात आणून दिली. दूषित पाण्याचे नमुने दाखविले. महापौर नंदा जिचकार यांनी गंभीर दखल घेत ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. तातडीने या समस्येवर तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. गडर लाईनचा विषयही गंभीर असून यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे तेथे उपस्थित महिलांनी सांगितले. या दोन्ही समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौरांनी करीत पाच लोकांची समिती समन्वयासाठी गठीत करण्याचे सुचविले. या आवाहनाला दाद देत तेथेच पाच जणांची समिती गठीत करण्यात आली. बाबू खान, एम.डी. सहारे, पृथ्वीराज बनसोड, अशोक भगत, शोभा कटारे यांचा या समितीत समावेश करण्यात आला. ही समिती मनपा अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून परिसरातील समस्या सोडवतील, असे महापौरांनी जाहीर केले. महापौर नंदा जिचकार यांनी तातडीने दखल घेत हुडको कॉलनीत जाऊन समस्येवर तोडगा काढल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
आयुक्त अश्विन मुदगल यांनीही अधिकाऱ्यांना निर्देश देत तातडीने समस्या मार्गी लावण्यास सांगितले. ज्या अतिक्रमणाचा अडसर असेल ते नागरिकांच्याच सहाय्याने काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय यांनी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी निधी मंजूर करून घेतला असल्याची माहिती दिली. लोकसहभागातून समस्या सोडविण्यासाठी मनपाने घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत करीत नागरिकांनी महापौरांसह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी ओसीडब्ल्यू आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.