
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कामठीजवळील कन्हान नदीच्या महादेव घाटावर रविवारी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. पिकनिकसाठी आलेल्या दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नदीतील खोल डोहात बुडणाऱ्या 6 वर्षीय चिमुकल्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आणखी दोघांनी जीव गमावला. या दुर्घटनेत चिमुकल्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रविवारची सुट्टी साजरी करण्यासाठी कामठी आणि नागपूर येथील दोन कुटुंबे कन्हान नदीकाठावरील महादेव घाट येथे आली होती. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कुटुंबातील सदस्य स्वयंपाकाच्या तयारीत व्यस्त असताना 6 वर्षीय चैतन्य आंबाडे नदीकिनारी खेळत खेळत खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला.
चैतन्यला वाचवण्यासाठी त्याचे काका गौतम आंबाडे यांनी तत्काळ नदीत उडी घेतली. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने तेही पाण्यात अडकले. गौतम यांना बुडताना पाहून तेथे उपस्थित असलेले रोहित नागदेव मदतीसाठी नदीत उतरले. दुर्दैवाने त्यांनाही पोहता येत नसल्याने तेही खोल डोहात बुडाले. काही क्षणांतच तिघेही पाण्याखाली गेले.
दरम्यान, गौतम यांचे वडील राजकुमार आंबाडे यांनीही बचावासाठी नदीत उडी घेतली. मात्र त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी स्वतःचा जीव वाचवला. या घटनेनंतर परिसरात एकच आक्रोश पसरला.
घटनेची माहिती मिळताच जुने कामठी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष हिवरकर आणि उपनिरीक्षक सागर भंडारी यांनी स्वतः नदीत उतरून शोधमोहीम राबवली. त्यानंतर तिघांचेही मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले.
एका निष्पाप चिमुकल्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने नदी, तलाव आणि जलाशय परिसरात सुरक्षिततेच्या नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.








