नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. आजच्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांचा विकास, शेतकरी, गरीब कल्याण, रोजगार या सगळ्यावर भाष्य करण्यात आले. वर्तमानाचा अभिमान आणि भविष्याबद्दल आशा व आत्मविश्वास, असा हा अंतरीम अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
‘जय अनुसंधान..!!’ हा नारा भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकेल असा दुर्दम्य आत्मविश्वास देणारा आहे, असेही ते म्हणाले. आजवर या देशाने ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान…’ हा नारा प्रबळ केला ; मोदी सरकारचा यापुढचा नारा आहे. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या गरजा,आकांक्षा आणि कल्याण हे मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आणि तोच आजच्या अर्थसंकल्पाचा गाभा आहे.
संसदेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी म्हटल्याप्रमाणे, मोदी सरकारचा जुलै महिन्यातील अर्थसंकल्प विकसित भारताचा नवा रोडमॅप घेऊन येईल,असेही बावनकुळे म्हणाले. नारीशक्ती, अन्नदाता शेतकरी, गरीब कल्याण, विकसित भारत, सर्वांगीण विकास साधणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प तसेच महिला सक्षमीकरण, महिलांना आर्थिक पाठबळ देणारा पायाभूत सुविधा मजबूत करणारा व युवकांना उद्यमशीलतेला – स्टार्टअप इनोवेशनला बळ देणारा ‘रोजगारदाता’ अर्थसंकल्प असल्याचे बावनकुळे म्हणाले.