बोले तैसा चाले, हे लबाडाचे आमंत्रण केळवद, धापेवाडा येथे हजारोंच्या उपस्थितीत जंगी प्रचारसभा
नागपूर: देशातील दुर्गम आदिवासी भागात राहणार्या 19 लाख परिवारांच्या घरापर्यंत सौभाग्य योजनेमार्फत वीज देणारे सरकार हे कमळाचेच सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचीच ही कामगिरी आहे. राज्यातील साडेसात लाख शेतकर्यांना वीज कनेक्शन देणारे सरकारही कमळाचेच आहे, हे लक्षात घेऊन सावनेर विधानसभेत कमळाचीच बटन दाबा. चुकीची बटन आपल्या आयुष्याचा सत्यानाश करून टाकेल, असे आवाहनवजा टीका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.
केळवद येथे भाजपा-शिवसेना रिपाई, बरिएमं व रासप महायुतीचे डॉ. राजीव पोतदार यांच्या प्रचारासाठ़ी आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. या सभेला उमेदवार डॉ. राजीव पोतदार, नितीन राठी, अरविंद गजभिये, प्रक़ाश टेकाडे, संजय टेकाडे, अशोक तांदूळकर, सोनबा मुसळे, सरपंच श्रीमती वानखेडे, दिनेश कुबिटकर, भीमराव मातीखाये आदी उपस्थित होते. धापेवाडा येथेही हजारोंच्या संख्येतील सभेला पालकमंत्री बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले- 22 हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरु आहेत. पंतप्रधान ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पालकमंत्री पांदन योजना अशी ही कामांची जंत्रीच आहे. या जिल्ह्यासाठ़ी काँग्रेसने कधीच 220 कोटीपेक्षा अधिक निधी दिला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने 778 कोटी निधी दिला आहे. यातील निधी देताना मला आमदाराच्या मार्फतच द्यावा लागतो. म्हणून भाजपाचा आमदार येथे पाहिजे.
बोले तैसा चाले हे लबाडाचे आमंत्रण आहे. या गावाला पाणीपुरवठ्यासाठी 1.20 कोटी व खनिज निधीतून 97 लाख रुपये दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
येत्या 24 तारखेला पुन्हा 220 आमदार महायुतीचे निवडून येणार असून देवेंद्र फडणवीस यांचे सरकार या राज्यात बनणार आहे. त्यामुळे विकास कामांची काळजी करू नका. शासनाच्या 45 योजना या गावांमध्ये आपण आणून कोट्यवधीचा विकास निधी आणणार व समाजातील शेवटच्या माणसाला, गोरगरिब जनतेला, या योजनांचा फायदा करून देणार असल्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
यावेळी भाजपानेते नितीन राठी यांनी जनतेला संबोधित करताना मतदारसंघात असलेल्या दबावाची, दहशतीची माहिती उपस्थितांना दिली. निधी आमचा आणि उद्घाटने करून कामाचे श्रेय लाटण्याचे प्रकार या मतदारसंघात सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. राजीव पोतदार यांनी या मतदारसंघातील दडपशाहीचे राजकारण गाडून टाका. आता दादागिरी, गुंडगिरीच्या विरोधात भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
