Published On : Tue, Feb 23rd, 2021

ठरलेल्या लग्नाला कोविडच्या नियमासह समारंभाची मुभा द्यावी

Advertisement

आमदार द्वय कृष्णा खोपडे व विकास कुंभारे मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार

नागपूर : राज्य सरकारने दि.07 मार्च पर्यंत राज्यात कोविड नियम सक्तीने पालन करण्याची तयारी दाखविली असून यात अनेक समारंभ रद्द झाले. मात्र राज्यात लाखोच्या संख्येत लग्न समारंभाची तारीख निश्चित झाली असून राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधामुळे लग्नघरी शोककळा पसरली की काय? अशी स्थिती आहे. कारण वधू-वरांच्या पालकाने हॉल बुक केले, हॉल, कटरर्स, बँडसह अनेकांना अॅडव्हांस देखील यांनी दिलेला असून अनेकांनी लग्नपत्रिका देखील वाटप केलेल्या आहेत. परंतु आता हॉलचे संचालक स्वत: बुकिंग रद्द करण्यासाठी या पालकांवर दबाव टाकत आहे. अशा परिस्थितीत या ठरलेल्या लग्न समारंभाला कोविडच्या नियमासह समारंभाची मुभा द्यावी. अशी मागणी आमदार द्वय कृष्णा खोपडे व विकास कुंभारे यांनी केलेली आहे. या मागणीसह दोन्ही आमदार मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट देखील घेणार आहेत.

अधिवेशन आले की सरकारला कोरोना आठवतो, सरकारचा अधिवेशन गुंडाळण्याचा डाव
कोरोनाच्या विळख्यात राज्य देशात पहिल्या क्रमांकावर होते. याचे खरे श्रेय या तिघाडी सरकारलाच द्यावे लागेल. वेळोवेळी निर्बध आणि सक्तीचे निर्देश देऊनसुद्धा अंमलबजावणीकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे यामुळेच राज्य पुन्हा कोरोनाच्या उंबरठ्यावर आहेतच. मात्र या तिघाडी सरकारला अधिवेशन आले की कोरोना आठवतो व अधिवेशन झाले की की कोरोनाचा विसर पडतो, हे सुद्धा तितकेच खरे आहे. त्यामुळे आता 1 मार्च पासून अधिवेशन सुरु होत असतना जनतेच्या प्रश्नाकडे कानाडोळा करण्यासाठीच कोरोनाकडे जनतेचे लक्ष वळविण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा डाव आहे की काय? याबाबत शंका निर्माण होणे साहजिक आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विकासकामे या सरकारने रोखून धरली असून या एक वर्षाच्या कालकीर्दीत कोणतेही उल्लेखनीय कार्य हे सरकार करू शकली नाही, हे विशेष. केंद्र सरकारने जगात पहिल्यांदाच कोरोना रोखण्यासाठी वॅक्सीन तयार करण्याचा विक्रम केला असून कोरोनाला रोखण्यात ख-या अर्थाने यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशातील प्रतिभावंत वैज्ञानिकांना आहे. येत्या अधिवेशनात या उपलब्धीबद्दल राज्य सरकारने सभागृहात अभिनंदन प्रस्ताव सादर करावा, अशीदेखील मागणी आमदार द्वय कृष्णा खोपडे व विकास कुंभारे यांनी केलेली आहे.