Published On : Mon, Dec 16th, 2019

तरुण पिढीला शेतीकडे वळवण्याचे काम कृषी विद्यापीठाला करावे लागेल – नाना पटोले

Advertisement

कृषी पदवीधारक आमदारांचा सत्कार ॲग्रोव्हेट-ऍग्रोइंजि मित्र परिवार संघटनेचा पुढाकार

नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा देशात लौकिक आहे. शेतकऱ्यांना नवीन संशोधनाचा, नवीन तंत्रज्ञानाचा फायदा मिळवून देण्यासोबतच, तरुण पिढीला शेतीकडे वळवण्याचे महत्त्वाचे काम पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला करावं लागेल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

ॲग्रो व्हेट -ॲग्रोइंजि मित्र परिवाराच्या वतीने कृषी पदवीधारक विधानसभा सदस्यांचा सत्कार समारंभ आज पंजाबराव देशमुख स्मृती स्मारक परिसराच्या आवारात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कृषी मंत्री सुभाष देसाई, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले, सत्कारमूर्ती आमदार सर्वश्री अनिल देशमुख, ॲड. अशोक पवार, श्यामसुंदर शिंदे, शेखर निकम, मनोहर चंद्रिकापुरे, अमर वऱ्हाडे, ॲग्रोव्हेट- ॲग्रोइंजि मित्र परिवार संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहितकर, प्रणय पराते, डॉ. सुनील सहतपुरे, मिलिंद राऊत आदी उपस्थित होते.

यावेळी संघटनेने विद्यार्थी व शेतकऱ्यांकरिता खुले अध्ययन केंद्र उभारण्याकरिता आर्थिक सहाय्यासाठी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कृषी पदवीधर आमदारांना एकत्र करण्याचं काम ॲग्रोव्हेट- ॲग्रोइंजि संघटनेने केले असे कृषिमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले. सध्या शेती हा राज्यासमोरील गंभीर प्रश्न आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीत बदल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे. यासाठी हे सुशिक्षित शेतकरी आमदार राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा विडा उचलतील, अशी अपेक्षा श्री देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला निश्चित विकासाच्या मार्गावर पुढे नेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.