Published On : Thu, Apr 24th, 2025
By Nagpur Today Nagpur News

दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होणार;पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा कठोर इशारा

Advertisement

पटना: काश्मीरच्या पहलगाम भागात घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या अमानुष हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले. या घटनेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर होते, मात्र त्यांनी तात्काळ दौरा थांबवून भारतात परत येत उच्चस्तरीय बैठक घेतली आणि कडवे निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली. पाकिस्तानविरोधात निर्णायक भूमिका घेत सिंधू नदी करार रद्द करण्यात आला असून, आणखी पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची पहिली जाहीर सभा गुरुवारी बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायत दिनानिमित्त पार पडली. या सभेत मोदींनी पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि न थेट नाव घेत पाकिस्तानला इशारा दिला.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मोदी काय म्हणाले?
“देशाने मोठं दुःख अनुभवलं आहे. अनेकांनी आपले आप्त गमावले – कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाचा पती या हल्ल्यात गेला. ते सर्वजण भारताच्या विविध भागांतून आले होते, पण त्यांच्या जाण्याने निर्माण झालेलं दुःख सगळ्यांचं सामूहिक आहे,” असं मोदी म्हणाले.

“हा हल्ला भारताच्या आत्म्यावर झाला आहे. ज्यांनी ही कटकारस्थानं केली, त्यांना त्यांच्या कल्पनाही न झालेल्या शिक्षेला सामोरं जावं लागेल. आता दहशतवाद्यांना जमिनीवरून नाहीसं करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची एकजूट हे त्यांचं शेवटचं काळं ठरेल,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.

तसेच, त्यांनी देशातल्या ग्रामविकासाच्या कार्याचा आढावा घेत सांगितले की, “पंचायतींसाठी ३० हजार नव्या इमारती उभारल्या गेल्या आहेत. दोन लाख कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना दिला गेला. जमीनविवादांवर तोडगा काढण्यासाठी डिजीटल नकाशे आणि नोंदणी प्रणाली आणली आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण देणारे बिहार पहिले राज्य आहे, हे गौरवास्पद आहे,” असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement