
ढाक : बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारकडून भारताशी संबंध अधिक मजबूत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
बांगलादेश सरकारने भारतीय बजेट विमान कंपनी SpiceJet ला त्यांच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास तात्पुरती मनाई केली आहे. या निर्णयाचा परिणाम विशेषतः कोलकाता–गुवाहाटी मार्गावरील काही उड्डाणांवर होत असून, विमानांना आता पर्यायी आणि अधिक लांब मार्ग स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे इंधनखर्च आणि प्रवासाचा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नेव्हिगेशन शुल्कासह काही प्रलंबित देयकांबाबतचा वाद या कारवाईमागे कारणीभूत असू शकतो. थकबाकीची अचूक रक्कम अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. दरम्यान, स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी सांगितले की संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद सुरू असून लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या कंपनीची उड्डाणे नियमानुसार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांत भारत-बांगलादेश संबंधांनी सकारात्मक वळण घेतले होते. व्यापार, सीमाव्यवस्थापन आणि वाहतूक सहकार्याच्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये प्रगती दिसून येत होती. अशा पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यातील द्विपक्षीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








