Published On : Mon, Aug 9th, 2021

संघ आणि विद्यार्थी परिषद व्यक्तिनिर्माणाचे केंद्र : ना. नितीन गडकरी

Advertisement

‘मैत्र जीवांचे‘ पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर: रा. स्व. संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे व्यक्तिनिर्माणाचे केंद्र आहेत. विद्यार्थी परिषदेने आम्हाला घडविले, संस्कार दिला. जीवन जगण्याची प्रेरणा दिली. हे आपण कधीच विसरू शकत नाही. तोच ठेवा ही आमची सर्वात मोठी संपत्ती असल्याची भावना केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

अभाविपच्या ‘मैत्र जीवांचे’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी सौ. कांचन नितीन गडकरी, सैदा रेड्डी, अलकाजी, जयंत पाठक, कृष्णा साकुळकर, सौ. पौर्णिमा फाटक प्रामुख्याने उपस्थित होते. जुन्या कार्यकर्त्यांच्या आठवणी जपत असताना व त्या काळाचे चित्र डोळ्यासमोर ठेवत ना. गडकरी याप्रसंगी म्हणाले- या निमित्ताने जुन्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. पण ज्यांच्यासोबत काम केले, बरोबरीने काम केले, ज्यांच्या मार्गदर्शनात काम केले, ते आज आपल्यात नाहीत. त्यांच्या आठवणीचे मनस्वी दु:ख आहे. प्लॅटफॉर्मवर येणार्‍या गाडीसारखे विद्यार्थी परिषदेचे आहे. काही काळासाठी विद्यार्थी येतो व नंतर जातो. रा. स्व. संघ आणि विद्यार्थी परिषदेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे की दोन्ही संघटना व्यक्तिनिर्माणाचे केंद्र आहे. रा. स्व. संघ आणि विद्यार्थी परिषदेतून आम्ही घडलो याचा मला अभिमान आहे.

वि.प.चे काम करीत असताना जुन्या कार्यकर्त्यांनी फार कठीण काळात काम केले. कार्यंकर्त्यांनी इतरांच्या दु:खात समरस होऊन काम करावे हा संस्कार विद्यार्थी परिषदेतून आम्हाला मिळाला, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- आपल्या सर्वांच्या जीवनात विद्यार्थी परिषदेने एक जीवनदृष्टिकोन दिला आहे. आपल्याला जो संस्कार मिळाला, जीवनदृष्टी मिळाली, त्याचे सादरीकरण योग्यप्रकारे झाले नाही, याची खंत असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.

आपला कार्यकर्ता हा स्वत:चा परिवार सांभाळून निस्पृह भावाने काम करीत असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- आपल्यापैकी सर्वांनी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात उत्तम काम केले आहे. त्यांचे राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी योगदान आहे. हे पुस्तक वाचल्यावर आपण जुन्या काळात जातो. त्या काळातील आठवणी ताज्या होतात. माणसे येणार आणि जाणार पण विचार कधी बदलणार नाही, व्यक्तिनिर्माणाचे कार्य कधी थांबणार नाही. संघ आणि विद्यार्थी परिषदेचा विचार आणि संस्कार घेऊन आपण पुढे जगत राहू, असेही ते म्हणाले.

ना. नितीन गडकरी, सौ. कांचन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. वैयक्तिक गीत कृष्णा साकुळकर यांनी सादर केले, तर प्रास्ताविक अलका करमरकर यांनी केले. ना. गडकरी यांच्या हस्ते यावेळी पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. जयंत देवपुजारी व सुनील शिनखेडे यांच्या कार्याचा परिचय यावेळी करून देण्यात आला. आभार भूपेंद्र शहाणे यांनी मानले.

या कार्यक्रमाला पौर्णिमा कुंटे, मंजुषा कानडे, अनिल देव, अनिल सांबरे, मीनाक्षी सांबरे, मदन सेनाड, सुनील पाळधीकर, पद्मा चांदेकर, मुरलीधर चांदेकर, वासंती देशपांडे, विद्या शहाणे, धनंजय भिडे, मंजिरी महाशब्दे, सौ. भेंडे, सुनील औरंगाबादकर, हर्षा औरंगाबादकर, नारायण मेहरे, माधुरी साकुळकर, माधुरी देवपुजारी, शुभांग गोरे, अनंत केळकर, रवी औरंगाबादकर, शैला शांडिल्य पिंपरीकर, प्रशांत मेंढी, उदयन पाठक, प्रमोद बोरावार शिल्पा पुराणिक, ज्योती बुजोणे, विनय माहूरकर, मालतीकाकू जोशी उपस्थित होते.