पुणे – राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी आपली भूमिका
स्पष्टपणे मांडली आहे. “हिंदी शिकवणं सक्तीचं नसावं, मात्र या भाषेविषयी द्वेष बाळगणं विद्यार्थ्यांच्या विकासासाठी योग्य नाही,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
राज्यातील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा तिसऱ्या भाषेच्या रूपात बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयावर अनेक शिक्षक संघटनांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
या मुद्द्यावर आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, “हिंदी भाषेची सक्ती असू नये. मुलांनी कोणती भाषा शिकावी हे त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या निर्णयावर सोडावं. मात्र, हिंदीविषयी द्वेष निर्माण होऊ नये, कारण देशातील बहुसंख्य लोक ही भाषा बोलतात.”
ते पुढे म्हणाले, “हिंदी शिकणं उपयोगाचं ठरू शकतं. देशात ५५ ते ६० टक्के नागरिक हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे संवादासाठी ही भाषा महत्त्वाची ठरते. पण कोणत्याही भाषेची जबरदस्ती ही चुकीचीच. शिक्षणाचा उद्देश समज वाढवणं असावा, दबाव टाकणं नव्हे.”
शरद पवार यांच्या या विधानामुळे राज्यातील भाषा धोरणावर नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या भाषिक स्वातंत्र्याचा सन्मान राखत संवाद कौशल्य वाढवण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असंही त्यांनी सुचवलं.