Published On : Thu, Mar 26th, 2020

बेजबाबदार, हुल्लडबाजांवर दंडात्मक कारवाई करा

Advertisement

धर्मपाल मेश्राम यांचे महापौरांना पत्र

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केल्यानंतरही अनेक बेजबाबदार व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडत आहे. हुल्लडबाजी करीत आहे. त्यांना वठणीवर आणण्यासाठी उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करावी, या आशयाचे पत्र मनपाच्या विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम यांनी महापौर संदीप जोशी यांना दिले आहे.

सभापती धर्मपाल मेश्राम यांनी पत्रात नमूद केल्याप्रमाणे, शहराच्या बाह्य भागातील नागरिकांनी कलम १४४ ला गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. प्रभाग क्र. २६ मधील अंतुजी नगर, सूरज नगर, संघर्ष नगर, तुलसी नगर, भांडेवाडी रेल्वे स्टेशनचा भाग, राधाकृष्ण नगर, अनमोल नगर, पवनशक्ती नगर, धरती माँ नगर, वैष्णोदेवी नगर, चाँदमारी नगर, न्यू पँथर नगर, पडोळे नगर झोपडपट्टी, सर्व खेळण्याची मैदान या भागात लोक घराबाहेर, रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी घोळक्याने उभे असतात.

मनपाच्या उपद्रव शोध पथकाच्या झोननिहाय चमूद्वारे अशा गैरजबाबदार हुल्लडबाजांवर कारवाई करून पोलिसांकडे देण्यात यावे. तसे निर्देश मनपा आयुक्तांना निर्गमित करावे, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे महापौर संदीप जोशी यांना केली आहे.

स्वत:च्या सुरक्षिततेकरिता शासन व प्रशासनाने दिलेले निर्देश पाळावेत. अशा जागतिक आपदास्थितीत “कोरोना” ह्या संक्रामक साथरोगापासून वाचण्यासाठी स्वयंस्फुर्तिने विलगीकृत व्हावे असे कळकळीचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.