Published On : Mon, Aug 28th, 2017

नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दखल घ्या – कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर OCW अधिका-यांना दिले निर्देश

Advertisement


नागपूर: नागरिकांना कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल घ्यावी, भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने दक्षता बाळगावी असे आदेश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले.

कन्हान येथून येणा-या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटल्याने उत्तर नागपूर व मध्य नागपूरच्या नागरिकांचा पाणी पुरवठा खंडीत झाला. नागरिकांची ऐन गणेशोत्सवादरम्यान झालेली गैरसोय बघता कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी ऑटोमोटिव्ह चौकात घटनास्थळी भेट दिली. व नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेविका यशश्री नंदनवार, शकुंतला पारवे, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, राजु चांदेकर आदी उपस्थित होते.

ऑटोमोटिव्ह चौकातील पाईपलाईन ही जुनी झाल्याने ती दुरूस्ती करण्याचे काम सुरू होते. परंतु त्या दुरूस्ती दरम्यानच मुख्य पाईपलाईनला धक्का लागल्याने पाईपलाईनचा व्हॉल्व फुटला, त्यामुळे उत्तर नागपूर मधील व मध्य नागपूरचा काही भागात पाणी पुरवठा खंडीत झाला. 16 तास उलटूनही पाणी पुरवठा सुरू न झाल्याने कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी संताप व्यक्त केला व अधिका-यांना खडेबोल सुनावले. ओसीडब्लुचा करार रद्द करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलताना केली. या सर्वाला प्रशासनाला जवाबदार घोषीत धरले आहे. यापुढे अशी कुठलीच प्रकारची घटना घटनार नाही याची विशेष खबरदारी घ्या, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.