Published On : Fri, May 26th, 2023

रविवारी संविधान चौकात त्रिपावन बुद्ध जयंती महोत्सव

Advertisement

नागपूर: मागील २८ मे २०२२ पासुन तर २०२३ मे पर्यंत ३६५ दिवस दररोज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प करण्यात आला. कारण १४ ऑक्टोंबर, ६ डिसेंबर, १४ एप्रिल, संविधान दिवस या दिवसालाच मात्र हजारोंच्या संख्येने जनता पुष्पहार अर्पण करून आता आपली जबाबदारी संपली, एवढे करून विसरून जातांना दिसतात. म्हणून ३६५ दिवस पुष्पहार अर्पण संकल्प अभियान समिती स्थापन करून समितीच्या वतीने संविधान चौक, नागपूर येथील परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती प्रतिमेला ३६५ दिवस दररोज पुष्पहार अर्पण करून संकल्प पुर्ण करण्यात आला असून समितीच्या वतीने भारत देशामध्ये एक नवीन उपक्रम निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावादी सामाजिक संदेश व धम्मक्रांतीला जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

रविवार २८ मे २०२३ ला दररोज पुष्पहार अर्पण करण्याच्या संकल्पास ३६५ दिवस पुर्ण होत आहेत. म्हणून त्याच दिवशी सायंकाळी ५ ते ८ वाजताचे दरम्यान संविधान चौक, नागपूर येथे २५६७ वी त्रिपावन बुद्ध जयंती महोत्सव व ३६५ दिवस दररोज पुष्पहार अर्पण संकल्प समारोहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाबोधी चॅरीटेबल ट्रस्ट, बोधगयाचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत हर्षबोधी महास्थवीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून तथागत बुद्धा शोधपीठ, मेरठ चे चेअरमन डॉ. आर. बी. पुस्करजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष भोपाळचे भदंत शाक्यपुत्र सागर महास्थवीर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यासोबतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, भूतपुर्व गृहमंत्री अनिलजी देशमुख, भूतपूर्व रजिस्ट्रार प्रा. डॉ. पुरणचंद्र मेश्राम, रतनलाल अहिरवार, डॉ.सुरेशजी चवरे, प्रकाशजी गजभिये, रमेशजी फुले, प्रभाकर भोयर, डॉ. युवराज मेश्राम, भैय्याजी खैरकार, श्यौराज सिंहजी, डॉ. जी.एस.गौतम (नयी दिल्ली) आणि दुनेश्वरजी पेठे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या जयंती महोत्सवात सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच आकाशवाणी, दुरदर्शनचे कलाकार अरूणभाऊ सहारे व संच, कळमेश्वर यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे.

पत्रकार परिषद मध्ये भदंत हर्षबोधी महस्थवीर, डॉ. पुरनचंद्र मेश्राम, भैय्याजी खैरकार, रमेशजी फुले, ज्योती बेले, प्रमिला टेंभेकर, त्रिवेणी पाटील, सुमन कानेकर, सचिन मून श्रीराम वानखेड़े उपस्थित होते.