नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार आमदारांनी निवडणूक याचिका फेटाळण्यासाठी दाखल केलेले अर्ज कायदेशीरदृष्ट्या निराधार व प्रक्रियेच्या विलंबासाठी असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केला आहे. सोमवारी त्यांनी या अर्जांचा जोरदार विरोध करत आपले प्रत्युत्तर सादर केले.
या प्रकरणी फडणवीस, मोहन मते, कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, सुधीर मुनगंटीवार व देवराव भोंगळे यांनी आपल्या विरोधातील याचिका तांत्रिक कारणांवर फेटाळण्याची मागणी करत अर्ज दाखल केले होते. मात्र, याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. आकाश मून यांनी हे अर्ज न्यायालयीन प्रक्रिया खोळंबवण्यासाठी असल्याचे नमूद करत त्यावरील आक्षेप फेटाळले.
या अर्जांवर उच्च न्यायालय लवकरच निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.