नवी दिल्ली: हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलीवूड म्हणू नये, अशी मागणी भाजपाचे महासचिव कैलाश विजयवर्गिया यांनी केली आहे. याबाबत ते केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांच्याकडे विजयवर्गीय ही मागणी करणार आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीला बॉलीवूड हे नाव बीबीसीने दिले आहे. केवळ हॉलीवूडची नक्कल करण्यासाठी हिंदी चित्रपट सृष्टीला बॉलीवूड असे नाव ते वापरू नये, अशी मागणी कैलाश विजयवर्गिया यांनी केली आहे.
“काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते सुभाष घई आमच्या मुख्यालयात आले होते. त्यांनी सांगितले की बीबीसीने हे नाव आपल्या चित्रपट क्षेत्राला दिले आहे. हॉलीवूडची नक्कल आपण करतो अशा आशयानं हा शब्द वापरण्यात आला होता. आपल्या उद्योगाची खिल्ली उडवण्यासाठी हा शब्द निर्माण झाला असल्यामुळे तो वापरणं ताबडतोब थांबवलं पाहिजे,” विजयवर्गिया यांनी सांगितले.
विजयवर्गिया यांनी सुभाष घई यांच्या #DontCallItBollywood या सोशल मीडियावरील कँपेनमध्ये सहभागही घेतला आहे. माहिती व प्रसारण खात्याशी या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार असून खात्यानं हस्तक्षेप करायला हवा अशी आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले.
“आपल्याकडे दादासाहेब फाळके व सत्यजीत रे यांच्यासारखे थोर चित्रपट निर्माते होऊन गेले. आपण अनेक सुंदर आणि अप्रतिम चित्रपट बनवले आहेत. असे असताना आपण फक्त हॉलीवूडची नक्कल करतो असे म्हणणे चुकीचे आहे. भारतीय चित्रपट सृष्टीचं महत्त्व सांगताना भाजपा नेत्याने फिक्की या संस्थेच्या अहवालातील आकड्यांचा दाखला दिला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीने १६५ अब्ज रुपयांचा व्यवसाय वर्षाला केला आहे. भारतात २४ भाषांमध्ये चित्रपट बनतात. दंगलसारख्या सिनेमानं तर १६०० कोटी रुपयांचा व बाहुबलीनं २००० कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचा दाखला विजयवर्गिया यांनी दिला आहे
आपल्या इथल्या फिल्म क्षेत्राला हिदी फिल्म इंडस्ट्री, तामिळ फिल्म इंडस्ट्री असं संबोधणं मानाचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. या गुलामी मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी प्रसारमाध्यमांनीही पुढाकार घ्यायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.