
नागपूर : बेरोजगारी, आर्थिक ताण आणि नैराश्य यांचा फायदा घेत काही समाजकंटक तरुणांना गुन्हेगारीकडे वळवत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या अशाच एका टोळीचा रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या टोळीचा सूत्रधार बेरोजगार तरुणांना महिन्याला १५ ते २५ हजार रुपये ‘पगार’ देऊन चोरी करण्यास प्रवृत्त करत असल्याचे उघड झाले आहे.
ही टोळी ‘खगडिया पेपर’ या नावाने ओळखली जाते. टोळीचा प्रमुख बिहारमधील खगडिया जिल्ह्याचा रहिवासी असून, सदस्य रेल्वेत पेपर वाचण्याचा बहाणा करून प्रवाशांचे लक्ष विचलित करतात आणि त्याच आडून चोरी करतात, त्यामुळे या टोळीला हे नाव पडले आहे.
आरपीएफच्या पथकाने नागपुरात झालेल्या एका चोरीच्या तपासादरम्यान या टोळीचा माग काढला. तपासादरम्यान कैलाश गणेश दास (४२), मिथिलेश रवि प्रसाद शाह (२९) आणि किशन सुभाष निषाद (२२) या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, टोळीचा सूत्रधार वर्षभर बेरोजगार आणि निराश तरुणांना शोधून त्यांच्याशी मैत्री करतो. त्यानंतर त्यांना कमी कष्टात चांगल्या पगाराची ‘नोकरी’ देण्याचे आमिष दाखवतो.
सुरुवातीला नव्या सदस्यांना छोट्या चोरीचे टार्गेट दिले जाते आणि त्यांचे प्रशिक्षणही केले जाते. हळूहळू त्यांना मोठ्या गुन्ह्यांमध्ये सामील केले जाते. प्रत्येक यशस्वी चोरीनंतर त्यांचा ‘पगार’ वाढवला जातो, त्यामुळे हे तरुण नकळत गुन्हेगारीच्या गर्तेत अडकत जातात.
टोळीची कार्यपद्धतीही अत्यंत शिताफीची आहे. सदस्यांना नागपूरमधील इतवारी, तसेच भिलाई, रायगड, बिलासपूर यांसारख्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात भाड्याने राहण्याची व्यवस्था करून दिली जाते. गर्दी आणि प्रवाशांची बेपर्वाई याचा फायदा घेत ही टोळी क्षणार्धात मौल्यवान वस्तूंवर हात साफ करते आणि पसार होते.
या कारवाईनंतर आरपीएफने अशा प्रकारच्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. बेरोजगारीच्या समस्येमुळे चुकीच्या मार्गावर जाण्यापेक्षा योग्य मार्ग निवडावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.








