
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटन अधिक पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जात असून, येथे लवकरच सोलर बोट सफारी सुरू होणार आहे. यासाठी वन विभागाने सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटींची चाचणी (ट्रायल) प्रक्रिया सुरू केली आहे.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात आता पारंपरिक इंधनाऐवजी सोलर बोटींच्या माध्यमातून बोट सफारी राबवण्याची तयारी करण्यात येत आहे. या सोलर बोटी पूर्णतः प्रदूषणमुक्त असल्याने जलाशयातील पर्यावरण तसेच वन्यजीवांवर होणारा परिणाम अत्यंत मर्यादित राहणार आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, पेंच जलाशय परिसरात ही सोलर बोट सफारी चालवण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या ट्रायलदरम्यान बोटींची तांत्रिक क्षमता, सुरक्षितता मानके तसेच पर्यटकांच्या सोयीसुविधांची तपासणी केली जात आहे. ट्रायल यशस्वी ठरल्यानंतर आवश्यक परवानग्या घेऊन ही सेवा सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुली करण्यात येईल.
सोलर बोट सफारीमुळे पेंच व्याघ्र प्रकल्पातील ईको-टूरिझमला चालना मिळणार असून, पर्यटकांना शांत, प्रदूषणमुक्त आणि नैसर्गिक वातावरणात जंगलाचा वेगळाच अनुभव घेता येणार आहे. हरित ऊर्जा आणि वनसंवर्धनाबाबत शासनाची बांधिलकी अधोरेखित करणारी ही महत्त्वाची पहल मानली जात आहे.








