Published On : Fri, May 24th, 2019

सोशल मिडियावरील ‘ट्रेंड’ न समजणारेच तोंडघशी : अजित पारसे

Advertisement

‘ईव्हीएम’ला दूषणे म्हणजे चुकांकडे दुर्लक्ष, सोशल मिडियाच्या सकारात्मक वापराला यश.

नागपूर: लोकसभा निवडणुकीत सोशल मिडियातून एका पक्षाने नागरिकांसोबत संवादातून चुकांत सुधारणा केल्या. त्या पक्षाला यश मिळाले तर सोशल मिडियावरील ‘ट्रेंड’ न समजणाऱ्या पक्षाला तोंडघशी पडावे लागल्याचे सध्याच्या निवडणूक निकालांनी स्पष्ट केले. आता ‘ईव्हीएम’ला दूषणे देणे म्हणजे झालेल्या चुकांवर पांघरूण घालण्याचाच प्रकार असल्याचे सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी नमुद केले.

‘सोशल मिडिया’ आज लोकशाहीचा अघोषित पाचवा स्तंभ होण्याकडे वाटचार करीत आहे. त्याचे गांभीर्य कळले नसल्याने त्यावर सक्रिय राहणाऱ्यांची नस ओळखण्यात सत्तर वर्षीय पक्षाला अपयश आल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे पारसे यांनी सांगितले. सत्तर वर्षाच्या प्रदीर्घ सत्ताकारणात या पक्षाने देशाला जे काही उत्तम दिले, त्याचा गवगवा करीत सोशल मिडियातून नागरिकांपर्यंत संवेदनशीलरित्या पोहोचण्याची संधी होती. जनतेसोबत दुतर्फी संवादाची संधीही होती. परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत केवळ नकारात्मक ‘पोस्ट’वर लक्ष केंद्रित करण्यात आला. स्वपक्षाची गुणवत्ता, चांगले निर्णय जनतेपुढे मांडण्याऐवजी पुढील पक्षावर चिखलफेकच अधिक झाली. त्याचा परिणाम जनतेत मोदींबाबत सहानुभूती वाढली अन्‌ जनतेने नकारात्मक राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याचे पारसे म्हणाले.

याउलट सत्तेपर्यंत पोहोचणाऱ्या पक्षाने सोशल मिडियाला गांभीर्याने घेतले. सोशल मिडियातून मुद्दे जनतेपर्यंत पोहोचविले, ते मुद्दे जनतेने नाकारल्यास त्यात सुधारणा केली. लोकशाहीत सत्तेची सर्वच पक्षाला समान संधी असते. परंतु जनतेशी जुडणाऱ्या पक्षालाच जनतेने कौल दिल्याचे स्पष्ट होत असल्याचे निरीक्षणही पारसे यांनी नोंदविले.

आता ईव्हीएम प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हा प्रकार म्हणजे जनतेने दिलेला कौल अमान्य करण्यासारखे आहे. मुळात रणनिती आखताना सोशल मिडियाचा वापर, त्याचे मानसशास्त्र समजून घेत जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळेल. ईव्हीएमवर आरोप किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे वारंवार जाऊन उर्जा घालविण्याऐवजी प्रभल्भपणे जनतेशी अधिक जवळीक साधल्यास लोकशाही आणखी बळकट होईलच, शिवाय सकारात्मक, विधायक कामामुळे पराभूत पक्षांनाही भविष्यात संधी असेल, असे भाकितही त्यांनी वर्तविले. सध्याच्या निकालांनी नकारात्मक धोरणांना तिलांजली देत विधायक कामाच्या प्रयत्न करणाऱ्या पक्षाला कौल दिला. यापासून पराभूत पक्षांनी धडा घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सध्या सोशल मिडियाच्या वापरामुळे लोकशाहीही ‘डिजिटल’ झाली. या डिजिटल लोकशाहीची शक्ती मान्य करून सर्वच पराभूत पक्षांनी जनतेशी सोशल मिडियाद्वारे सकारात्मक बाबींवर संवाद आवश्यक आहे. ईव्हीएमला दूषणे म्हणजे जखम डोक्याला व पट्टी पायाला, असा प्रयत्न करण्याऐवजी पराभूत पक्षांनी सोशल मिडियाबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
– अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक