Published On : Mon, Jan 24th, 2022

…तर आजच्या भारताचे चित्र वेगळे असते : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील विविध पैलुंवर अभ्यासपूर्ण लाईव्ह संबोधन

नागपर, : भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या चाणाक्ष बुद्धीद्वारे आणि स्वाभिमानी बाण्यातून अनेक कार्यवाह्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केल्या. इंग्रजांना चकवा देत जर्मनी आणि पुढे जपानची मदत घेऊन अंदमान निकोबार येथे पहिला तिरंगा फडकाविणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाच्या दुरदृष्टीचा विचार करणारे नेतृत्व होते. इंग्रजांशी लढताना इंग्रज शरणागती पत्कारणार तोच त्यांच्या ‘आजाद हिंद सेनेतील’ विश्वासूने दिलेल्या दग्यामुळे स्वातंत्र्याची लढाई त्यांना हरावी लागली. त्यावेळी नेताजींनी ती लढाई जिंकून भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज देशभरात फडकावला असता तर आजच्या भारताचे चित्र काहीशे वेगळे असते, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका या विषयावर आयोजित फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौरांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बालजीवनपासून ते अखेरच्या प्रसंगांवर आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून प्रकाश टाकला.

नेताजी सुभाषचंद्र यांच्यावर बालपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचा पगडा होता. शाळेत इंगज सरकारची प्रार्थना न म्हणण्यासाठी केलेले बंड ते पुढे महावि‌द्यालयाज ओटन या इंग्रज शिक्षकाकडून देशातील महान व्यक्ती, नागरिकांबाबत काढण्यात आलेल्या वक्तव्यावरही वि‌द्यार्थ्यांना एकत्रित करून शिक्षकाला माफी मागण्यास भाग पाडले. दहावीत प्रावीण प्राप्त करणारा सुभाष ते आयसीएस परीक्षेत आंतरराष्ट्रीय स्तरावर चवथा क्रमांक पटकाविणारे सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रज सरकारमधील सनदी अधिकाऱ्याची नोकरी नाकारून आपले जीवन देशासाठी अर्पण केले. देशासाठी असलेली समर्पण भावना आणि चिकाटी यातून पुढे नेताजी मोठे आंदोलन उभे करू शकले. चित्तरंजन बाबुंनी दिलेल्या शिकवणूकीतून ते घडले पुढे गांधीजींशी त्यांची जुवळेली नाळ, त्यांच्या आंदोलनात, त्यांच्या मार्गदर्शनात घेतलेले निर्णय आणि पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याशी असलेली मैत्री हे सर्व प्रसंग महापौरांनी आपल्या शैलीतून डोळ्यापुढे उभे केले.

नेताजींची नागपूर शहराशी असलेल्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. फारवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस नागपुरात आले होते. त्यावेळी त्यांना जास्त बोलता न आल्याने त्यांनी नागपुरात पुन्हा येण्याची आणि पुढील भेटीत हिंदीत भाषण देण्याचा मानस व्यक्त केला होता. दिलेल्या शब्दाप्रमाणे नेताजी पुन्हा नागपुरात आले आणि त्यांनी हिंदीत भाषणही दिले. हिंदी शिकण्यासाठी नेताजींनी हिंदीच्या शिक्षकाकडून प्रशिक्षण घेतल्याचेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष असताना सात राज्यात असलेल्या काँग्रेसच्या सरकारमधील उद्योगमंत्र्यांना एकत्रित करून त्यांचे देशातील पहिले अधिवेशन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भरविले होते. देशाच्या भवितव्याच्या दिशेने भविष्यातील त्यांनी मांडलेल्या औद्योगिक संकल्पना पाहून अधिवेशनाचे अध्यक्ष सर विश्वेश्वरैया भारावून गेले. स्वतंत्र भारतातील नागरिक, युवा हे स्वयंपूर्ण असावेत, भारत औद्योगिकदृष्ट्या सक्षम आणि बलाढ्य असावे ही संकल्पना पूर्ण करण्याच्या हेतूनेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आजाद हिंद सेनेच्या माध्यमातून अखेरपर्यंत लढा दिला. मात्र या लढ्यात स्वकीयांकडून मिळालेल्या दग्यामुळे यश मिळू शकले नाही. अन्यथा नेताजींच्या नेतृत्वातील भारताचे चित्र वेगळे असते, असेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.