
नागपूर : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ पर्यटकांपैकी चार जण शनिवारी रेल्वेने सुखरूप नागपुरात परतले. यामध्ये इंदिरा चौधरी, सुलोचना खापरे, दीपक पांडे आणि वर्षा उपाध्याय यांचा समावेश आहे. नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाने केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.
पर्यटकांनी सांगितले की, नेपाळमध्ये अडकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रशासनाकडून सातत्याने मदत करण्यात आली. अडकलेल्या प्रवाशांना अन्न, औषधे तसेच आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली. सुरक्षित बाहेर पडण्यासाठी बसचीही व्यवस्था करण्यात आली. बिहार प्रशासनाकडूनही प्रवाशांना चांगले सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नागपुरात परतलेले चारही पर्यटक गुरुवारी रात्री काठमांडूहून विमानाने दिल्लीला पोहोचले होते. त्यानंतर रात्री सुमारे ८ वाजता त्यांनी दिल्लीहून केरळ एक्स्प्रेसने प्रवास सुरू केला आणि शनिवारी नागपुरात दाखल झाले.
नेपाळमध्ये अडकलेले इतर नागपूरकर पर्यटक बिहारमार्गे रेल्वेने नागपूरकडे रवाना झाले आहेत. त्यांचेही रविवारी नागपुरात आगमन होण्याची शक्यता आहे. परतलेल्या पर्यटकांनी नेपाळमधील परिस्थिती तसेच परतीच्या प्रवासादरम्यान प्रशासनाकडून मिळालेल्या मदतीचा अनुभव सांगितला.




