मुंबई: राम मंदिर वादाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 1990-91 मध्ये चंद्रशेखर पंतप्रधान असताना राम मंदिर बाबत एक समिती बनवली होती. या समितीनं वादावर तोडगा म्हणून मंदिर आणि मशिदीमध्ये जागेचं वाटप केलं होतं. असा गौप्यस्फोट पवारांनी केला. ते मुंबईत बोलत होते.
‘चंद्रशेखर पंतप्रधान असताना राम मंदिरबाबत एक समिती बनवली होती. त्यात मी आणि भैरवसिंग शेखावत होतो. माझ्याकडे राम मंदिर न्यासशी चर्चा करण्याची जबाबदारी होती. तर शेखावत यांना बाबरी मस्जिद कृती समितीशी चर्चा करायला सांगितलं होतं. यामध्ये असा तोडगा निघाला होता की, पूर्ण जागेचं वाटप मंदिर आणि मशिदीमध्ये करायचं 65-66% जागा मंदिरासाठी आणि उरलेली मशिदीसाठी द्यायची. पण चंद्रशेखर यांचं सरकार पडलं आणि गोष्टी थांबल्या.’ असा गौप्यस्फोट शरद पवारांनी आज केला.
जर चंद्रशेखर यांचं सरकार पडलं नसतं तर 1990-91 मध्येच राम मंदिरबाबत ठोस तोडगा निघून योग्य ती कार्यवाही देखील झाली असती. असं पवार यावेळी म्हणाले.