Published On : Tue, Dec 12th, 2017

विरोधकांच्या संयुक्त मोर्चाने ऐन हिवाळ्यात नागपूर तापलं; विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

Advertisement


नागपूर: शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधत आक्रमक झाले आहेत. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षांचा संयुक्त जनआक्रोश आणि हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दीक्षाभूमी येथे दर्शन घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चा थेट विधानभवनावर धडकणार आहे. शरद पवारयांच्या सोबत गुलाम नबी आझाद हे ही मोर्चात सहभागी झाले आहेत.

शरद पवार यांचा आज 77 वा वाढदिवस आहे. ते वाढदिवशी भाजप सरकारच्या रस्त्यावर उतरणार आहेत. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसह, काँग्रेस, शेकाप, सपाचे सहभागी होणार आहेत.


पवारांच्या पायाच्या अंगठ्याचे ऑपरेशन
दरम्यान शरद पवारांच्या पायाच्या अंगठ्याचे ऑपरेशन झाले आहे. त्यांना प्रकृतीचा किरकोळ त्रासही आहे. असे असताना ही ते हल्लाबोल मोर्चात सहगागी झाले आहे.

दुसरीकडे, विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर सत्तेतून खाली या, अशी विरोधकांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर विरोधक वेलमध्ये येऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली. विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकरी आणि सामान्यांच्या विषयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काँग्रेस-राष्ट्रवादीने हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे.

राजकारणात पन्नाशी पूर्ण केलेल्या शरद पवार यांचा आज 77 वा वाढदिवस आहे. या राजकीय प्रवासात त्यांनी महाराष्ट्रासह केंद्रात अनेक महत्त्वाची पदे भूषणली आहेत. पवारांनी तब्बल 30 वर्षांनी सरकाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. याआधी 1985 मध्ये त्यांनी तत्कालीन राज्य सरकारविरोधात सायकल मोर्चा काढला होता. जळगावातून सुरु झालेला हा सायकल मोर्चा नागपुरात संपला होता.