Published On : Mon, Aug 26th, 2019

वाढत्या आरक्षणाविराेधात नागपुरात ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ माेर्चा

Advertisement

नागपूरः आमचा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, हे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नको. राज्य सरकारचे मराठा आरक्षण आणि केंद्र सरकारचे आर्थिक आरक्षण यामुळे राज्यात आरक्षणाचा टक्का ७४ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. अन्य आरक्षण लक्षात घेता हे ८५ टक्क्यांपर्यंत जात असून, गुणवंत विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. ७० वर्षे झाले, आता मतांचे राजकारण बंद करा, अशा शब्दांत रोष व्यक्त करत ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’साठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, माहेश्वरी, अग्रवाल, जैन, उत्तर भारतीय संघ, वैश्य समाज, आर्य वैश्य समाज, कायस्थ समाज, ख्रिश्चन, सिंधी पंचायत, खंडेलवाल समाज यांसारखे सुमारे १०० समाज ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ची मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले. रविवारी यशवंत स्टेडियम येथून काढण्यात आलेल्या या मोर्चात नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, अमरावती, औरंगाबाद अशा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पुरुष, महिला, युवक या मोर्चात सहभागी झाले. सकाळी १०.३० वाजता मोर्चाला सुरुवात झाली त्यानतर पंचशील चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, मॉरीस कॉलेज टी पॉइंट, आरपीआय चौक या मार्गात जात कस्तुरचंद पार्क येथे सभा घेण्यात आली. डॉ. संजय देशपांडे, डॉ. अनुप मरार, डॉ. अनिल लद्दड, सचिन पोशट्टीवार, बच्ची पांडे, अर्चना कोठारी यांनी ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ save merit save nation nagpur या आंदोलनाची भूमिका मांडली. १० वर्षांच्या सारा संघवी या विद्यार्थीनेही आपला रोष व्यक्त केला.

खुल्या वर्गासाठी केवळ १५ टक्के आहे आणि त्यातही सर्वांसाठी ते खुले असल्याने समाजात रोष वाढत असल्याची खंत व्यक्त करत सरकारने आता विकासाचे राजकारण करून मतांचे राजकारण बंद करावे, असा रोष मोर्चातून व्यक्त करण्यात आला.

पुढील पिढ्यांसाठी हा सगळा खटाटोप असून, त्यांना न्याय मिळावा. व्होट बँकेसाठी सरकारने वेळोवेळी खुल्या प्रवर्गातील लोकांवर अन्याय केला आहे. त्यांच्या हक्काच्या जागा आरक्षित करून त्यांना समान संधींपासून दूर ठेवले. त्यामुळे सर्व समाज एकत्र आला असून हा आवाज सत्ताधार्यां पर्यंत पोहचला पाहिजे, असे आवाहन या मोर्चातून करण्यात आले. हिंगणघाट येथील नवव्या वर्गातील विद्यार्थिनी सारा सिंघवी हिने भाषण करीत वातावरणात उत्साह भरला.