Published On : Mon, Dec 2nd, 2019

१२ मीटर पेक्षा मोठे रस्ते अतिक्रमणमुक्त व्‍हावेत

Advertisement

अतिक्रमण निर्मूलनासंबंधी गठीत समिती सदस्यांचा एकमताने निर्णय

नागपूर: संपूर्ण शहरात अतिक्रमणाची मोठी समस्या आहे. फुटपाथ आणि रस्त्यावरील वाढते अतिक्रमण ही गंभीर बाब आहे. रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे अपघाताचेही प्रमाण वाढत आहे. अशात अतिक्रमणासंबंधी कठोर निर्णय घेणे आवश्यक असून १२ मीटर पेक्षा मोठ्या रस्त्यांवरील अतिक्रमण पूर्णत: काढले जावे व याबाबत मनपा आणि पोलिस विभागाकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात यावी, असा एकमताने निर्णय सोमवारी (ता.२) घेण्यात आला.

शहरातील अतिक्रमणाच्या समस्येसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेउन अहवाल तयार करण्यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत केली. सोमवारी (ता.२) छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहात झालेल्या समितीच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.

बैठकीत आयुक्त अभिजीत बांगर, वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडीत, समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी, सदस्य सर्वश्री विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, सदस्या आभा पांडे, एसीपी (वाहतूक) जयेश भांडारकर, सहायक आयुक्त सर्वश्री अशोक पाटील, महेश धामेचा, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, विशेष आमंत्रित सदस्य ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती ॲड.संजय बालपांडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, सहायक आयुक्त विजय हुमने, उपअभियंता (वाहतूक) शकील नियाजी आदी उपस्थित होते.

यावेळी अतिक्रमण निर्मूलनासंदर्भात धोरण करण्याविषयी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शहरातून पूर्णत: अतिक्रमण निर्मूलनासाठी झोननिहाय पथक गठीत करणे, झोननिहाय अधिका-यांची जबाबदारी निश्चीत करून कारवाई करण्यात निष्काळजीपणा बाळगणा-या अधिका-यांवरही कारवाई करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पक्के बांधकाम करून दुकान चालविणा-या दुकानदारांकडून दुकानासमोर केले जाणा-या अतिक्रमणासंदर्भातही कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. पक्क्या बांधकामापुढे अतिक्रमण करणा-यांच्या दंडामध्ये वाढ करणे, दुकानांच्या पुढे विस्तार करून अतिक्रमण करणा-यांकडून जप्त करण्यात येणारे सामान परत द्यायचे अथवा नाही, याबद्दलही बैठकीत चर्चा करण्यात आली.

मनपा परवानाधारकांवरही व्हावी कारवाई
महानगरपालिकेकडून परवाना घेउन व्यवसाय करणा-यांकडून होणा-या अतिक्रमणाबाबतही कठोर निर्णय घेणे आवश्यक असून अशा अतिक्रमणधारकांकडून अधिक वाढीव दंड वसूल करण्याचे प्रावधान करणे तसेच वारंवार अतिक्रमण होत असल्यास परवाना रद्द करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी रविवारी संघटितरित्या नवीन बाजार निर्माण होत आहेत. रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतूक जाम करणा-या अशा बाजारांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक गठीत करणे शिवाय दिवसभर किंवा सायंकाळी व्यवसाय केल्यानंतर फुटपाथवर ठेवले जाणारे ठेले, हातगाड्याबाबत रात्रकालीन पथकाकडून कारवाई व्हावी, याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवल्यास तिप्पट दंड
बांधकाम साहित्याची विक्री करणा-या व्यावसायीकांकडून रस्त्यावर साहित्य ठेवले जाते. रस्त्यावर बांधकाम साहित्य आढळल्यास अशा व्यावसायीकांकडून सामान्य दंडाच्या रक्कमेच्या तिप्पट जास्त रक्कम दंड म्हणून वसूल करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. फुटपाथ, रस्त्यावर ठेवण्यात येणा-या वाहनांवर वाहतूक पोलिस विभागाकडून कारवाई करण्यात यावी, या कारवाईला महानगरपालिकेतर्फे सहकार्य करून जप्त करण्यात आलेले वाहन ठेवण्यासाठी मनपातर्फे मैदान उपलब्ध करून देण्याबाबत सर्वांनी एकमत दर्शविले. यापुढे अतिक्रमण कारवाईमध्ये मनपा पथकासह पोलिस विभागाकडूनही समांतर दंड वसूल करण्यात यावे. त्यामुळे अतिक्रमणधारकांना एकाच कारवाईत दुप्पट दंड भरावा लागल्यास अतिक्रमणाबाबत भिती निर्माण होईल, या संदर्भातही चर्चा झाली.

विविध विषयांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या संपूर्ण चर्चेतून धोरण निर्धारित केले जाणार आहे. योग्य निर्णयासाठी या धोरणाचा अहवाल महापौरांकडे सादर करण्यात येणार आहे.