पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वतःहून पद सोडण्याची इच्छा व्यक्त करून राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केली आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्षात ताज्या नेतृत्वाची गरज असल्याचं ठाम मत मांडले.
जयंत पाटील म्हणाले, “मला सात वर्षे या जबाबदारीची संधी मिळाली. आता नव्या चेहऱ्यांना पुढं आणणं गरजेचं आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा, ही माझी विनंती आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की, हा निर्णय पक्षाच्या भविष्यासाठी आणि नव्या पिढीच्या सक्रिय सहभागासाठी महत्त्वाचा ठरेल.
कार्यक्रमातील प्रमुख घडामोडी-
-शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, निलेश लंके आदी नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
-पाटील यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या, त्यामुळे त्यांना भाषण थांबवावे लागले.
– हा पक्ष शरद पवारांचा आहे. अंतिम निर्णय त्यांनीच घ्यावा, कारण आपल्याला अजून बरेच काही गाठायचं आहे,असेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, भाजपचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. एकेकाळी दोन खासदार असलेला पक्ष आज देशाचा सर्वात मोठा पक्ष बनला. आपण जर एकदिलाने मेहनत घेतली, तर महाराष्ट्रात पुन्हा यश मिळवू शकतो. शेवटी त्यांनी एक सणसणीत राजकीय संदेश दिला.ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम यांच्यातली आहे. आपली भूमिका स्पष्ट आहे. आपण तुकारामांच्या बाजूला आहोत. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पक्षात बदलाच्या चर्चांना वेग आला असून, शरद पवार यांचा पुढील निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.