मुंबई – राज्यात दिवाळीनंतर महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वच प्रमुख पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यातील संभाव्य युतीचे संकेत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
ठाकरे गटाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत दिलेल्या वक्तव्यातून युतीच्या चर्चांना बळ मिळाले आहे. “मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत येईल, त्याच्यासोबत आम्ही नक्कीच एकत्र लढू,” असे सूचक विधान करत आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबत युतीसंदर्भात संकेत दिले.
“आम्ही आमच्या बाजूने भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्या भावना मांडल्या आहेत. अलीकडेच दीपेश म्हात्रे आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी एकत्र आंदोलन केलं, हे त्या दिशेने एक पाऊल मानता येईल. आमचे मन स्वच्छ आहे आणि जनतेच्या भावना आम्हाला ठाऊक आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील युतीच्या चर्चांना दुजोरा दिला. “राज ठाकरे यांनी युतीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे, आणि उद्धव ठाकरे यांनीदेखील तीच भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे लवकरच युतीबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे,” असे राऊत म्हणाले.
तथापि, मनसेकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “सकारात्मकतेची भाषा पुरेशी नाही, त्यासाठी कृती आवश्यक आहे. जर ठोस पावलं उचलली गेली, तरच पुढे काही सांगता येईल.”